मोबाइल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाइन विश्वातील भुलभुलैय्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्तही झाले आहे. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बंदी असलेली गेम इंटरनेटवरून डाउनलोड करून घेत खेळण्यास सुरुवात केली आणि त्या चक्रात 40 लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. राज्यातील-देशातील खेड्यापाड्यात तसेच शहरांमध्ये असंख्य जणांना अशा गेम्समुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. याबाबत कायदेशीर तक्रार करता येत असली तरी बहुतेकदा अशा गेम्स डाउनलोड करताना किंवा खेळण्यास सुरुवात करताना आपण सर्व प्रकारची संमती दिलेली असते. त्यामुळे अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणे गरजेचे आहे.
घटना क्रमांक 1 : जालना जिल्ह्यातील परमेश्वर केंद्रे नामक एका तरुणाला मागच्या एक वर्षापासून मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरुवातीला त्याने शंभर, एक हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामध्ये त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळाले. त्यानंतर तो हजारो रुपये यामध्ये गुंतवून हा गेम खेळू लागला. बघता बघता यामध्ये शेतजमीनही विकावी लागली असून वर्षभरात त्याने तब्बल 40 लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आज या तरुणाला गावात पानटपरी चालवण्याची वेळ आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणानं थेट पोलिसात धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बॅंक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला. या छोट्याशा गावात तीस ते चाळीस मुलं या गेमला बळी पडले असल्याचे सांगितले जाते. मॉस्ट बेट या गेमवर भारतात बंदी आहे. त्यामुळे हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण परमेश्वरने ऑनलाइन लिंकद्वारे हे गेम डाउनलोड केला आणि होतं नव्हतं ते सगळं घालवून बसला.
घटना क्रमांक 2 : गतवर्षी इंदूरमधील बसंत नामक एका तरुणाने आत्महत्या केली. आपल्या मेव्हण्यासोबत तो इंदूरमध्ये राहात होता. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाइन लुडो खेळण्याचे व्यसन होते. या गेममध्ये त्याने पैसेही गुंतवले होते. गेमिंगमुळे वसंत खूप कर्जबाजारी झाला होता. यामुळे तो खूप तणावाखाली होता. बसंतने त्याच्या सुसाइड नोटमध्ये संपूर्ण प्रकरण नोंदवून ठेवले. त्यानुसार, त्याला ऑनलाइन गेममध्ये खूप त्रास झाला. यामध्ये त्याचे सुमारे 17 हजार रुपयांचे नुकसान झाले. हे पैसे त्याने त्याच्या मालकाकडून घेतले होते. पैसे परत करणे कठीण होऊन दबाव वाढू लागल्यावर त्याने मृत्यूला कवटाळले.
घटना क्रमांक 3 : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधील मनाली न्यू टाउनमध्ये 29 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. या महिलेला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. या व्यसनात तिने घरातील 20 तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड गमावली. भवानीच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच नातेवाईकांनी तिला वारंवार रम्मी खेळण्यापासून दूर राहण्याचे सांगितले मात्र, तरीही भवानीने ऑनलाइन गेम खेळणे सुरूच ठेवले. ऑनलाइन गेममुळे भवानीचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच, शिवाय तिच्यावर कर्जही झाले होते. तिला कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. पण आपण ऑनलाइन गेममध्ये पैसे जिंकून आणि डोक्यावरचं कर्ज फेडू असा तिचा मानस होता. त्यामुळे तिने आपल्या दोन बहिणींकडून तीन लाख रुपये उसने घेतले आणि पुन्हा ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली. मात्र यातही तिचे नुकसान झाले आणि अखेर तिने तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
घटना क्रमांक 4 : राजगड येथील पडोनिया गावात राहणाऱ्या विनोद डांगी या तरुणाला ऑनलाइनच्या तीन पत्ती गेमचे व्यसन लागले होते. तो दिवसभर खेळत राहायचा, पण या नादात त्याने आपले 10 लाख रुपये गमावले. त्याने इतर लोकांकडून देखील पैसे उसने घेतले होते. त्यामुळे त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले. तो महिन्याभरापासून खूपच शांत होता. एके दिवशी तो एकाएकी घरातून गायब झाला आणि अखेरीस त्याचा मृतदेह रेल्वेट्रॅकवर आढळला.
गतवर्षी हैदराबाद सरकारने संपादित केलेल्या जमिनीची भरपाई म्हणून एका शेतकऱ्याला 1 कोटींची रक्कम मिळाली. मात्र हा सर्व पैसा त्याच्या मुलाने ऑनलाइन कॅसिनोमध्ये उडवल्याचे समोर आले. किती भीषण आणि धक्कादायक आहेत या घटना? हल्ली अशा प्रकारची एखादी तरी बातमी वाचायला मिळते. अशा बातम्या वाचून कोणाही सहृदयी माणसाचे मन हेलावून जाते. मग प्रत्यक्ष ज्याचा पैसा जातो त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल? हे अतीव दुःख, हाराकिरी, त्यातून आलेले नैराश्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुष्यभर झिजूनही गेलेला प्रचंड पैसा परत मिळवू शकू की नाही याबाबतची साशंकता, जोडीला हा पैसा देण्यासाठी वाढणारा दबाव या सर्वांतून अखेरीस मृत्यूला कवटाळले जाते.
एकविसाव्या शतकात मोबाइल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीने किती असाध्य गोष्टी साध्य झाल्या आहेत, वेगवान झाल्या आहेत, सुकर झाल्या आहेत याची प्रचिती आपण सर्व जण घेत असताना याच ऑनलाइन विश्वाची ही काळी बाजू किती भीषण आहे? घडलेल्या सर्व घटनांमध्ये सदर व्यक्तीच दोषी आहेत, यात शंकाच नाही. परंतु त्यांना दोषी ठरवून या समस्येला पूर्णविराम देता येईल? मुळात वर उल्लेख केलेली उदाहरणे ही माध्यमांमधील बातम्यांमुळे समोर आली आहेत. प्रत्यक्षात ती हिमनगाचे टोक आहेत. गेल्या दोन-चार वर्षांमध्ये देशात झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी लाखो रुपये गमावलेल्यांची संख्या काही हजारांमध्ये-लाखांमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेअर बाजारातील फ्युचर-ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दररोज हजारो रुपये गमावणाऱ्यांचे प्रमाणही अलीकडील काळात प्रचंड वाढले आहे.
ऑनलाइन रमीसारखे गेम आणि शेअर बाजारातील ट्रेडिंग या दोन्हींची तुलना करता येणार नाही. कारण बहुतांशी ऑनलाइन गेम्स या लोकांची लुबाडणूक करण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक नियमांचे उल्लंघन राजरोसपणाने होत असते, ही वस्तुस्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्याच समाजाने डोक्यावर घेतलेले सेलीब्रेटी अशा गेमिंग ऍप्सच्या जाहिरातींमधून झळकताना दिसतात आणि पैसे मिळवून श्रीमंत व्हा अशा आशयाचे आवाहन करताना दिसतात. या आवाहनासाठी त्यांना भरभक्कम पैसा मानधन म्हणून मिळत असला तरी त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते हे लक्षात घ्यायला हवे.
अर्थात, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाबाबत दुसऱ्यावर खापर फोडणे हे चुकीचे असते. कारण व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःच्या मानसिक, आर्थिक स्वार्थासाठी, गरजेसाठी, आनंदासाठी ते व्यसन करत असते. ऑनलाइन गेम्सच्या नादाला लागून पैसे गमावणाऱ्यांनाही त्यांचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतच असतात; परंतु या खेळांमध्ये दिसणारा पैशांचा आकडा हा असे सल्ले झुगारण्यास प्रवृत्त करतो. इथे काही तासांत पैसे दुप्पट-तिप्पट होतात आणि आपण ते करु शकतो, असा फाजिल, फसवा आत्मविश्वास अशा गेमच्या आहारी गेलेल्यांमध्ये आलेला असतो आणि तोच अखेरीस त्यांचा घात करतो.
– ऍड. प्रदीप उमाप, कायदे अभ्यासक