सुमारे दोन तास आंदोलन करून नोंदवला निषेध
तक्रारी, निवेदनांना केराचीटोपली
राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते अपूर्ण ठेवल्यामुळे परीसरात जाणाऱ्या भागातील रहिवाशांना घराकडे, शेतात, परिसरात जाण्यासाठी अडचण होत होती त्यासाठी चागंलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडे आणि ठेकेदाराला विनंती करुन देखील कोणतीच हालचाल होत नाही.
अखेर तुकईवाडी ग्रामस्थांचा बांध फुटला आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी (दिं.14) ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बाह्यवळ रस्त्यावर खडी, मुरूम टाकून बांध करून बंद करीत आंदोलन करुन निषेध नोंदवला. राष्ट्रीय महामार्ग नागरिकांनी अडवल्याने प्रशासनाची मोठी धावपळ झाली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तुकईवाडी गावापासून सुरू होणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर या परिसरातून सेवा रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. बाह्यवळण रस्त्यासाठी झालेल्या भूसंपादनाची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अद्यापही देण्यात आली नाही. या महामार्गावरील तीव्र उतारामुळे वाहनांच्या प्रंचड असणाऱ्या वेगामुळे स्थानिकांना रस्ता ओलांडता येत नाही. त्यामुळे अपघात होत आहे.
स्थानिकांसाठी सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने तयार करण्याऐवजी ठिकठिकाणी अपूर्ण ठेवण्यात आले आहेत. हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुकाईवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रांत अधिकारी, तहसीलदार व सबंधित विभागाकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या मात्र त्यांच्या या तक्रारींकडे सपशेल दुर्लक्ष होत होते.स्थानिकांना होणाऱ्या अडचणी, अपघात यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची पावित्रा घेतली. स्थानिक प्रशासनाने लवकर मार्ग काढू असे वेळकाढू उत्तर देत एकही प्रश्न सोडवला नसल्याने नागरिक आक्रमक झाले.
तुकईवाडी ग्रामस्थांसह सरपंच विजय थिगळे, उपसरपंच प्रवीण कोरडे, ऍड. अभिजित सांडभोर, देवराम कोरडे, सोपान कोरडे, राहुल कोरडे, पंकज रोडे, भिवसेन भांबुरे, पुडंलिक थिगळे, आदिसह ग्रामस्थांनी नवीन बाह्यवळण महामार्गावर खडीचे ढीगारा टाकुन राष्ट्रीय महामार्ग बंद केला. त्यामुळे राजगुरुनगर शहरातुन जाणा-या महामार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाल्याने अखेर स्थानिक प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.
ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडून उडवाउडवीचे उत्तर
राजगुरूनगर शहरात अचानक वाहतूककोंडी झाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यांच्याकडे स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावर मार्ग काढण्यासाठी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, सतीश गुरव यांनी स्थानिक ग्रामस्थांची चर्चा केली. ग्रामस्थांनी विविध प्रश्नांना महामार्ग बाह्यवळण करणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने स्थानिक ग्रामस्थ अजूनच आक्रमक झाले.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
जोपर्यंत आमच्या मागण्या नियमानुसार पूर्ण होत नाही, तोपर्यंत बाह्यवळण मार्ग बंद ठेवण्याची भूमिका घेतली. अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. तहसीलदार पोलीस प्रशासनाने याबाबत ग्रामस्थ, प्रांत विक्रांत चव्हाण, महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर महामार्गावर टाकण्यात आलेल्या खडीचे ढीग हटविण्यात आले. आठ दिवसांत बैठक न झाल्यास, प्रश्न न सुटल्यास पुन्ह बाह्यवळण मार्ग बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे.
ठेकेदाराकडून उपाययोजना नाहीत
बाह्यवळण महामार्गावरील कामे अपूर्ण आहेत. एका बाजुच्या रस्त्याकडेने सुरक्षितता नसल्यामुळे रात्रीच्या वेळी चालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. दिशादर्शक फलक, गतिरोधक न बसवल्यामुळे मोठा अपघात घडण्याची भीती आहे, असे असून देखील कोणतीही उपाययोजना ठेकेदाराने केली नसल्याचे प्रशासनाला घटनास्थळी दाखवून दिले. त्यामुळे प्रशासनाने ही संबंधित कामांच्या प्रतिनिधींना तत्काळ सूचना देत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना जागेवरच दिल्या.