क्विन्सटाऊन – न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले चारही सामने गमावलेल्या भारताच्या महिला संघाने अखेर पाचव्या लढतीत विजय प्राप्त करत प्रतिष्ठा जपली. सुमार कामगिरीमुळे टीकेची धनी बनलेल्या स्मृती मानधनाने या सामन्यात अफलातून 71 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला.
येत्या 4 मार्चपासून महिलांची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत असून मालिका गमावल्यानंतरही भारतीय महिला संघाने मिळवलेला विजय खेळाडूंची मानसिकता उंचावणारा ठरणार आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. भारताकडून सलामीवीर मानधनाने 71 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कारही पटकावला. प्रथम फलंदजी करणाऱ्या न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 251 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 252 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने शेफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांच्या रूपाने दोन फलंदाज गमावले. त्याचवेळी मानधनाने आधी दीप्तीच्या साथीत तर नंतर हरमनप्रीत कौरच्या साथीत संघाला दीडशतकी धावांचा पल्ला पार करून दिला.
मानधनाने आपले अर्धशतकही पूर्ण केले. ती आपल्या शतकाकडे वाटचाल करत असतानाच अमेलिया केरने तिला 71 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. मात्र, हरमनप्रीत कौर आणि कर्णधार मिताली राज यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. 66 चेंडूत 63 धावांची खेळी करून आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर देणारी हरमनप्रीत बाद झाली. अखेर मिताली राज आणि रिचा घोष यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता 46 व्या षटकात पूर्ण केली. मिताली राजने नाबाद 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.