कापूरहोळ (वार्ताहर) – तेलवडी (ता. भोर) येथे दोन सख्ख्या बहिणींचा गुंजवणी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली.
श्रावणी रामदास धावले (वय 13) व तेजा रामदास धावले (वय 11) अशी मृत बहिणींची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, श्रीवणी व तेजा रविवारी दुपारी 12 वाजता आई वडिलांसमवेत गायी व कपडे धुण्यासाठी गुंजवणी नदीवर गेले होते. त्यावेळी अचानक तेजाचा पाय नदीपात्रा शेजारी घसरला. तिला वाचवण्यासाठी श्रावणी धावली ती हात देण्यास पुढे गेली तर तीही नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेली.
वडिलांना पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलींना ते वाचवू शकले नाही. अचानक गुंजवणी नदीच्या पाण्याचा वेग व प्रवाह वाढल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांना पाण्यातून बाहेर काढून नसरापूर सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नेण्यात आले मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. याप्रकरणी राजगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.