नवी दिल्ली : आपण बाहेर खरेदीसाठी गेल्यानंतर दुकानदार आपला फोन नंबर मागतात. मात्र आता अशा प्रकाराला आळा बसणार आहे. कारण ग्राहक मंत्रालयाकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून ग्राहकांचा असा मोबाईल नंबर न घेण्याच्या सूचना मंत्रालयाकडून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याविषयी माहिती दिली आहे. ग्राहकांकडून अनेक तक्रारी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने अॅडव्हायजरी जारी केली आहे. मोबाईल नंबर दिला नाही म्हणून काही रिटेलर्स सर्व्हिसेस देण्यासाठी नकार देतात अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. या तक्रारींमध्ये ग्राहकांचे म्हणणे होते की, रिटेलर्स किंवा दुकानदार हे काँटॅक्ट डिटेल्स नसतील तर बिल जनरेट करता येणार नाही असे सांगतात. यानंतर मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे
कंज्यूमर प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत ही चुकीची प्रॅक्टीस आहे. रोहित कुमार सिंह यांनी, ‘दुकानदार हे ग्राहकांची इच्छा नसेल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाहीत. या प्रकारामुळे ग्राहकांना होणाऱ्या असुविधेचा विचार करुन रिटेल इंडस्ट्री आणि CII, FICCI आणि ASSOCHAM सारख्या संस्थांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
शॉपिंगनंतर बिल घेताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागीतल्यास दुकानदाराच्या डेटाबेसमध्ये ग्राहकांचा नंबर फीड होतो. यामुळे नंतर ग्राहकांना ऑफर्ससाठी फोन किंवा मेसेज केले जातात. या कॉल्स आणि मेसेजेसमुळे बऱ्याचदा ग्राहकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आता अॅडव्हायजरी जारी केली आहे.