नवी दिल्ली : भारत सरकारने देशात लागू असलेल्या विद्यमान वीज दर प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज मंत्रालयाने शुक्रवारी वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, 2020 मध्ये टाइम ऑफ डे टॅरिफ प्रणाली लागू करण्यासाठी आणि स्मार्ट मीटरिंगचे नियम सुलभ करण्यासाठी दुरुस्तीची घोषणा केली. ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे नवीन नियम लागू झाल्यानंतर दिवसाच्या वेळेनुसार विजेचे वेगवेगळे दर निश्चित केले जातील. आता ग्राहकांना दिवसभर एकाच दराने वीज द्यावी लागणार नाही.
दिवसा सहसा वीज दिव्यांसाठी कमी वापरली जाते. सूर्योदय ते सूर्यास्ताच्या साधारण आठ तासांच्या कालावधीत, उजेड भरपूर असतो. या कालावधीला राज्य विद्युत नियामक आयोगाने सौर तास असे संबोधले आहे. या कालावधीदरम्यान वीज दर सामान्य दरापेक्षा 10%-20% कमी असतील. तर सर्वाधिक वीजेच्या वापराच्या काळात, म्हणजेच “पीक अवर्स’दरम्यान वीज दर 10% ते 20 टक्के जास्त असेल.
ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या मते, टाइम ऑफ डे या निकषावरील दर प्रणाली पुनर्संचयित केल्याने ग्राहकांचे वीज बिल कमी होईल आणि यामुळे देशातील ऊर्जा संसाधनांचा अधिक चांगला वापर होईल. ऊर्जा मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की 1 एप्रिल 2024 पासून 10 किलोवॅट्स किंवा त्याहून अधिक वापरणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे दर लागू होईल.
1 एप्रिल 2025 पासून, कृषी क्षेत्रातील ग्राहक वगळता, सर्व वीज ग्राहकांसाठी त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल. बहुतांश राज्य वीज नियामक आयोगांनी मोठ्या व्यावसायिक आणि औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांसाठी टाइम ऑफ डडे ही नवी दरप्रणाली सुरू केली आहे. यासोबतच स्मार्ट मीटरिंगचे नियमही सुलभ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्राहकांची कोणतीही गैरसोय किंवा त्रास टाळण्यासाठी जास्तीत जास्त अनुज्ञेय भारापेक्षा जास्त वीजेची मागणी करण्यासाठी सध्याचा दंडही करण्यात आला आहे.