नवी दिल्ली – आता न्यायाधीशांचे काम आणखी कठीण झाले आहे. आमच्यावर आता नवीन प्रकारचे ओझे आहे. यापूर्वी न्यायालयाच्या खोलीतच एखाद्या खटल्याची सुनावणी होण्यावर भर दिला जात होता. पण सध्या तशी परिस्थिती नाही.
आता यूट्यूबवरील लाइव्ह स्ट्रिमिंगमुळे देशभरातील लोक आम्हाला थेट पाहू शकतात. म्हणूनच, काय बोलायचे आणि काय नाही, याचे दडपण न्यायमूर्तींवर असते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केले.
प्रयागराजमध्ये ‘कोर्ट्स ऑफ उत्तर प्रदेश’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले, न्यायालयांना असणाऱ्या सुट्ट्यांवरून आमच्यावर खूप टीका होते. न्यायाधीशांना भरपूर रजा मिळते, असे लोक बोलतात.
पण न्यायाधीशांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागते, हे लोकांना समजत नाही. आमचे जिल्हा न्यायाधीश रोज काम करतात. शनिवार-रविवारीही तो कायदेशीर मदत शिबिर किंवा प्रशासकीय कामात व्यग्र असतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आठवड्याच्या शेवटी (वीकेण्ड) होणाऱ्या परिषदा आणि व्याख्यानांची माहिती द्यावी, जेणेकरून लोकांसमोरही तेही मांडता येईल, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले की, ही केवळ तंत्रज्ञानाची आवड असलेल्या सरन्यायाधीशांची कल्पना नाही तर, संपूर्ण न्यायिक यंत्रणा पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायाधीशांची कार्यक्षमता वाढते. याशिवाय, त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेसमोर दिला जातो. याशिवाय कोर्टरूमध्ये घेतले जाणारे निर्णय लोकांप्रती उदासीन नसून ते समाजाभिमुख असल्याचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे देखील अधोरेखित होते, असेही त्यांनी नमूद केले.