जालना – मंगळवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावत होती. तसा डॉक्टरांनी आम्हाला अहवाल दिला. त्यानुसार, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यासाठी ते तयारही झाले होते. पण, काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. एसआरपीचे जवान जखमी झाले.
त्यामुळे हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला, असा खुलासा पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रविवारी केला. डॉ. चव्हाण म्हणाले, आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
अंबड या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे 40 आरोपींना अटक केली. एसआरपीच्या तीन कंपन्या मिळाल्या आहेत. बाजूच्या ठाण्यातून फोर्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे.
दोन पोलीस गंभीर; आयसीयूमध्ये दाखल
नागरिकांनी कुठल्याही प्रक्षोभक भाषणाला बळी पडू नये. कायदा आपल्या हाती घेऊ नये. शांततेचे वातावरण राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. आंदोलनाच्या दिवशी महिला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दोन पोलिसांना आयसीयूमध्ये भरती करावे लागले. सात जणांचे सीटीस्कॅन करावे लागले. हे वास्तव असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जमाव आक्रमक झाल्यानंतर आम्ही जमावाला शांततेचे आवाहन केले होते. आंदोलकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बळाचा वापर करावा लागला. हिंसक आरोपींना ताब्यात घेतले आहे. 21 महिला पोलीस आणि 43 पुरुष पोलीस असे 64 पोलीस कर्मचारी जालना सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी यावेळी दिली.