मस्कत :- भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया करंडकातील सामना पावसाने धुतला असला तरी तिकडे हॉकीच्या मैदानात मात्र भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. शनिवारी (दि.२) हॉकी 5-एस आशिया करंडकात निर्धारित 4-4 अशी बरोबरी साधल्यानंतर भारताने पाकिस्तानला पेनल्टी शुटआऊटमध्ये 2-0 अशा फरकाने पराभूत करत करंडकावर आपले नाव कोरले.
हॉकीच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानचा संघ एकवेळ 3-2 असा आघाडीवर होता. पण भारतीय खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये आपला खेळ उंचावला. दोन सत्राचा खेळ संपला तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत सुटला.
भारतासाठी मोहम्मद राहिल (19 व 26मि.), जुगराज सिंग (7मि.) आणि मनिंदर सिंग (10मि.) यांनी नियमन वेळेत गोल केले, तर गुरजोत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोलरक्षकावर मात केली. तर पाकिस्तानकडून अब्दुल रहमान (5मि.), कर्णधार अब्दुल राणा (13मि.), जिकिरिया हयात (14मि.) आणि अर्शद लियाकत (19मि.) यांनी निर्धारित वेळेत गोल केले.
भारताने मलेशियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्तानने ओमानला हरवत फायनल गाठली होती. पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानच्या संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या हापमध्ये जरदबस्त खेळाचे प्रदर्शन केले.
पाकिस्तनाच्या संघाला थोडाही वाव दिला नाही. पॅनेल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून मनदीर सिंह याने विजयात मोठी भूमिका बजावली.
एफआयएच विश्वकरंडकासाठी पात्र …
भारताने या विजयासह आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या(एफआयएच) 5-एस विश्वकरंडकाची पात्रता मिळवली. भारतासह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तान आणि मलेशिया संघ देखील विश्व करंडकासाठी पात्र ठरले आहेत. हा विश्वकरंडक 24-31 जानेवारी यादरम्यान रंगणार आहे.