वाई – करोनामुळे सर्वकाही बंद असल्यामुळे गरीब गरजूंचे अन्नावाचून हाल होऊ नयेत या पार्श्वभूमीवर वाई शहरात शिवभोजन थाळीचा प्रारंभ करण्यात आला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, सपोनि राजेंद्र कदम, वैद्यकीय अधिकारी संदीप यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण जगात करोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. करोनामुळे जगातील दोनशेहून अधिक देशातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. भारतातही तिच परिस्थिती आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी राज्य शासनाने शिवभोजनच्या माध्यमातून सामान्यांना पाच रुपयात जेवणाची थाळी सुरु केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. वाई येथे सुरु करण्यात आलेले शिवभोजन थाळी केंद्र 12 ते 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु राहणार असून शंभर थाळ्यांची परवानगी देण्यात आली असून गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली.