संगमनेर – युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचं ठरवलंय. आता तालुक्यात काय करायचे तुम्ही ठरवा. वर्षानुवर्षे प्रतीक्षेत राहिलेल्या आढळा, म्हाळुंगी नदीकाठावरील 21 गावांना युती सरकारच पाणी मिळवून देईल, आशी ग्वाही गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील निमगाव, भोजापूर येथे निळवंडे कालवा जलसेतूच्या कामाचे उद्घाटन ना. विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमिताने राजापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ना. विखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता म्हणाले, संगमनेर तालुक्याला पाणी दिले असते, तर त्यांच्या मागे कोण फिरले असते? तालुक्याला पाणी मिळाले असते, तर शेतकरी सक्षम झाला असता. पण आश्वासनापलीकडे हा तालुका पुढे गेलाच नाही. राज्यात पुन्हा युती सरकार येणार आहे.
त्यामुळे निळवंडे कालव्यांची काम होत असतानाच आढळा, म्हाळुंगी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना ना.विखे यांनी अधिकार्याना केल्या. राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यानी केला आहे. पश्चिम वाहीनी नद्याचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवून नगर, नाशिक आणि मराठवाड्याला दिलासा देण्याचे धोरण युती सरकारने घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.