मुंबई – राज्यात “पुनश्च हरिओम’ म्हणत दुसऱ्या टप्प्यात सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे वेळेचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढलेल्या सुधारित परिपत्रकात हे निर्बंध उठवण्यात आले आहे. त्यानुसार आता दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे बंधनकारक असणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले लॉकडाऊन टप्प्याने खुले करण्यात येत आहे. मुंबईतील अनेक मंडई, दुकाने हे 5 जूनपासून सुरू करण्यात आले आहेत. यात सम-विषम पद्धतीने म्हणजे एक दिवस उजवीकडे आणि दुसऱ्या दिवशी डावीकडील दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असल्याने दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत निश्चित करण्यात आली होती, पण ही वेळ अपुरी असल्याने दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात होती. पालिका आयुक्तांनी ही मागणी मान्य करत प्रशासनाने वेळेवरील निर्बंध आजपासून (बुधवारी 10 जून) उठवले आहेत.