मुंबई : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी करोना गो, करोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे.
त्यांनी करोना गोसोबतच आता महाविकास आघाडी गो-गोचा नाराही दिला आहे. तसेच मध्यप्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रातही यावा, असेही म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले, मी करोना गो असे म्हटले आहे. करोना महाराष्ट्रात किंवा भारतात जास्त आलेला नाही. तरीही आम्ही करोनाला जायला सांगितले आहे.
त्याची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांसोबत आपल्यावर आहे. करोना आपल्यात, आपल्या गावात, आपल्या देशात यायला नको. यासाठी जी काळजी घ्यायला हवी ती घेतली पाहिजे.
त्यामुळे जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत “करोना गो, करोना गो’ असे आम्ही म्हणत राहणार आहोत. मात्र, करोना गो म्हणत असताना महाविकास आघाडी गो-गो असेही आम्हाला म्हणावे लागेल.
उद्धव ठाकरेंना हेच सांगणं आहे की त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रावादीच्या चक्रव्युहात जास्त अडकू नये. आपली परंपरा, विचारधारा पाहता बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल, तर आपण पुन्हा भाजपमध्ये आले पाहिजे.
भाजप, शिवसेना आणि आरपीआयचं सरकार महाराष्ट्रात आले पाहिजे. आपण आला नाही, तर भूकंप होण्याची शक्यता आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्रातीलच आहेत.
ते मराठी भाषिक आहेत. ते भाजपमध्ये आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आता मध्य प्रदेशचा जो व्हायरस आहे, तो महाराष्ट्रातही आला पाहिजे. महाराष्ट्रात असा भूकंप होणं आवश्यक आहे.
शरद पवार असा भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप कधी होतो हे लक्षात येत नाही. भूकंप अचानक होतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.