नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्थापन केलेल्या काँग्रेस सुकाणू समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्य संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्याबरोबरच पूर्ण अधिवेशनाचा कार्यक्रम आणि ठिकाण यावर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षप्रमुख सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, आनंद शर्मा, मीरा कुमार आणि अंबिका सोनी यांचा समावेश होता.
बैठकीविषयी माहिती देताना काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, आज काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत आम्ही दोन विषयांवर चर्चा केली. पहिले आमच्या पक्षाचे पूर्ण अधिवेशन आहे जे आम्ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात घेण्याचे ठरवले आहे.
रायपूर, छत्तीसगड येथे हे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे. दुसरे, आम्ही भारत जोडो यात्रेच्या भविष्यातील कृतीचा आढावा घेतला आणि चर्चा केली. त्यानुसार येत्या 26 जानेवारीपासून आम्ही ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांची ही मोहीम असणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
रविवारी सायंकाळी राजस्थानमध्ये दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी सभेला उपस्थित राहिले नाहीत. खरगे यांनी ऑक्टोबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली होती. एआयसीसीचे सरचिटणीस (संपर्क) जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण अधिवेशनाची तारीख ठरवणे आणि ते कोठे आयोजित केले जावे आणि या विषयावर चर्चा केली जाईल.