नवी दिल्ली : पाकिस्तानी महिला सीमा हैदरचे प्रकरण ताजे असतानाच रविवारी राजस्थानमधील भिवडी शहरातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. भिवडी जिल्ह्यातील एक महिला तिच्या पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजस्थानच्या भिवडी जिल्ह्यातील एक विवाविहत भारतीय महिला पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. अंजू असे या महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अरविंद आहे. जयपूरला जाते असे सांगून तिने घर सोडले होते. परंतु, रविवारी तिने भारतीय सीमा ओलांडली असल्याची माहिती पती अरविंदला प्रसिद्धी माध्यमांद्वारे मिळाली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या माध्यमातून तिची पाकिस्तानमधील नसरुल्लाह नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. त्यानंतर अंजु दोन मुले आणि पतीला सोडून लाहोरला गेली आहे.पाकिस्तानात आपल्या प्रियकाराला भेटायला गेलेल्या अंजूने तिचा पती अरविंदसोबत व्हॉट्सअॅपवर संपर्क ठेवला होता. ती सध्या लाहोरला असून दोन तीन दिवसांत परत येणार असल्याचे तिने अरविंदला सांगितले आहे. धक्कदायक म्हणजे आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे अरविंदला माहित आहे. परंतु, ती परत येईल या आशेवर तो आहे.
अरविंद हा भिवडी येथे काम करतो आणि अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरीला आहे. तिला परदेशात नोकरीसाठी अर्ज करायचा असल्याने तिने २०२० मध्येच पासपोर्ट बनवला होता. अरविंदबरोबर लग्न करण्याकरता तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या जोडप्याला आता दोन मुले आहेत. अरविंद त्याच्या पत्नी आणि मुलांसह अंजूच्या भावासह भिवडी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.
गुरुवारी अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने तिच्या भिवडी येथील घरातून निघून गेली. त्यानंतर ती तिचा २९ वर्षीय फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे नसरुल्ला आणि अंजू यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली, असे एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे. तर, आज न्यूज या पाकिस्तानी चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, अंजू ३५ वर्षीय असून नसरुल्ला २९ वर्षीय आहे. त्यांची फेसबुकवर मैत्री आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. सध्या अंजू मलाकंद जिल्ह्यात असून अप्पर दीर पोलिसांकडून सुरक्षा पथकाकडून तपास सुरू आहे. तिच्याकडे असलेल्या व्हिसानुसार तिला ३० दिवस पाकिस्तानात राहण्याची परवानगी आहे. दरम्यान, नसरुल्लाहच्या कुटुंबीयांनी वेगळाच दावा केला आहे. पाकिस्तान फिरण्यासाठी ती येथे आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सीमा हैदर अवैध मार्गे भारतात आली होती. कोणत्याही कागदपत्राशिवाय तिने भारतात वास्तव्य केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु, अंजूकडे व्हिजा होता. त्यामुळे तिला पाकिस्तानात अधिकृत प्रवेश मिळाला. ती वाघामार्गे पाकिस्तानात आली आणि इस्लामाबादला गेली.