सातारा – जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी वेळेत येत नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या निदर्शनास आली होती. सोमवारी अचानक सर्व विभाग सरप्राईज व्हिजिट दिली असता विविध विभागांमधील 33 कर्मचारी कामावर वेळेत हजर नसल्याने निदर्शनास आले. या 33 कर्मचाऱ्यांना नोटीसा काढण्याचे आदेश श्री. खिलारी यांनी दिले असून शिस्त पाळून गतीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.
खिलारी यांनी जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांची कामे गतीने होण्याबरोबर कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळण्याबाबत ते आग्रही आहेत. बरेच कर्मचारी कार्यालयात वेळेत येत नाहीत, बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंदी करत नाही अशा बाबी पुढे आल्या होत्या.
प्रत्यक्षात सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 ही कार्यालयीन वेळ असतानाही सोमवारी सकाळी 10.30 वाजता विविध विभागांत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी सरप्राईज व्हिजिट केली असता 33 कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य, बांधकाम उत्तर, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, एनआरएचएम या विभागातील अनुपस्थिती लक्षणीय होती.
याबाबत मनोज जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांना अहवाल दिल्यानंतर संबंधित 33 कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीसा काढून खुलासा मागवण्याचे आदेश श्री. खिलारी यांनी दिले. शिस्त पाळा, वेळेत कामे करा, कामांना गती द्या, यापूर्वी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा, अशा सूचनाही ठराव समिती सभेत श्री. खिलारी यांनी दिल्या आहेत.
सोमवार, गुरुवारी मुख्यालय सोडू नका
जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी सोमवारी व गुरुवारी मुख्यालय सोडू नये. या दोन्ही दिवशी अभ्यागतांना जास्तीत जास्त भेटी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. त्याचबरोबर अत्यंत आवश्यक असलेल्या कामाची पूर्तता करावी. नागरिकांनी गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. विभागप्रमुखांनी सुट्ट्यांना जोडून सुट्ट्या घेऊ नये, अशा सूचनाही श्री. खिलारी यांनी ठराव समिती सभेत केल्या.