लेखी म्हणणे सादर करण्याचा आदेश; दलालांनी काढला पळ
सातारा – खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज येथे तहसील कार्यालयात सामान्यांची लूटमार सुरू आहे. त्याकडे लक्ष देण्यास तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना वेळ मिळत नाही. प्रतिज्ञापत्रापासून रेशनकार्ड, फेरफार या सर्व कागदपत्रांसाठी अलिखित “दरपत्रक’ तयार करण्यात आले आहे.
कार्यालयात पैशाशिवाय कागद हालत नसल्याने सामान्यांची पिळवणूक होत आहे, अशा आशयाचे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केल्यानंतर खटाव-माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी तहसीलदार अर्चना पाटील यांना नोटीस काढून खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या अडचणीत वाढ झाली असून कार्यालयातील दलालांनी पळ काढला आहे.
विविध प्रकारची कागदपत्रे आणि अनुदान व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वडूज येथील तहसील कार्यालयातील दलालांकडून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. दलालांनी काही कर्मचाऱ्यांशी संधान साधून “दुकानदारी’ सुरू केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तहसील कार्यालयातून दलाल हद्दपार करावेत, अशी मागणी जनतेतूून वारंवार होत होती.
हा सगळा प्रकार तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांच्या निदर्शनास आणूनही त्यांनी काहीच कारवाई न केल्याने या प्रकारांना प्रशासनाची मूकसंमती आहे का, अशा आशयाचे वृत्त “प्रभात’ने गुरुवारच्या (दि. 13) अंकात “खटावच्या तहसील कार्यालयात कामांसाठी दरपत्रक’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतर माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी तहसीलदार अर्चना पाटील यांना नोटीस बजावली आहे. याबाबत जिरंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.