पाकच्या सुरात सूर मिसळून जागतिक व्यासपीठाद्वारे भारतावर शरसंधान साधणारे मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांचा राजकीय कडेलोट झाला आहे. आधी पंतप्रधानपद गेले. नंतर स्व:पक्षातील विश्वासू नेत्याने कट्टर विरोधकांशी आघाडी केली. स्वतःच स्थापन केलेल्या पक्षातून डच्चू मिळाला. पक्षाचे सदस्यत्वदेखील रद्द केले गेले आहे. इस्लामी जगताच्या नेतृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या या नेत्याचा स्वकियांनीच राजकीय कडेलोट केला आहे…
भारतातील नागरिकत्व सुधारणा विधेयक असो, की काश्मीरचा मुद्दा असो, अथवा वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकचे प्रत्यार्पण असो, या सर्व मुद्द्यांवर भारताविरोधात दंड थोपटणारे व पाकला उघड साथ देणारे मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त आप्तस्वकियांनीच घडवून आणला आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून काढण्यात आले, शिवाय त्यांचे पक्ष सदस्यत्वदेखील रद्द केले गेले. त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षाने अन् एकेकाळच्या त्यांच्या विश्वासू शिष्योतमाने ही “गुरूदक्षिणा’ त्यांना दिली.
फक्त भारतालाच नव्हे तर सौदी अरेबियालादेखील आव्हान देत समांतर इस्लामी राष्ट्र संघटनेची स्थापना करण्याच्या हालचाली गतवर्षी पदावर असताना त्यांनी केल्या होत्या. तुर्कस्थान, पाकिस्तान, कतार अन् इराणला सोबत घेऊन त्यांना “ओआयसी’ (इस्लामी राष्ट्र सहकार्य परिषदे)ला पर्याय उभा करायचा होता. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेची किंमत अशा प्रकारे मोजावी लागल्याच्या प्रतिक्रिया महाथीर समर्थक व्यक्त करताना दिसतात. महाथीर यांच्या कारकिर्दीला लागलेले ग्रहण हे देशांतर्गत राजकारणाचा परिपाक आहे, मात्र त्यांना “हुतात्मा’ ठरविण्याचा समर्थकांचा प्रयत्न दिसत आहे.
2018 ला त्यांचे पंधरा वर्षांनी सत्तेत पुनरागमन झाले होते. तत्पूर्वी त्यांनी दोन दशके मलेशियावर राज्य केले होते. दोन वर्षांपूर्वी आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. महाथीर यांच्याकडे काठावरील बहुमत होते. मे 2020 मध्ये पदत्याग करून माजी पंतप्रधान व घटक पक्षाचे प्रमुख अन्वर इब्राहिम यांच्याकडे सत्तासूत्रे देण्याचा समझोता आघाडीमध्ये झाला होता. या कालावधी पूर्वीच महाथीर यांनी पायउतार व्हावे म्हणून इब्राहिम यांचा पक्ष दबाव वाढवत होता. सप्टेंबर 2020 मध्ये मलेशियात होणाऱ्या एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉंग्रेसच्या शिखर परिषदेनंतर पदत्याग करू, असे महाथीर यांनी घटक पक्षांना विनवले.
मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. महाथीर यांनी अकस्मात राजीनामा दिल्यावर दोन दिवसांनी चर्चेचा प्रयत्न केला. तेथील घटनात्मक प्रमुख असलेले राजे सुलतान अब्दुल्लाह शाह यांनी रिक्त पदावर सत्तारूढ पक्षाचे मोहियोद्दीन यासीन यांची नियुक्ती केली.ही बाब महाथीर यांना रुचली नाही. त्यांनी नाराजी दर्शविली. महाथीर यांच्याच तालमीत राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या यासीन यांनी “मास्टर स्ट्रोक’ खेळून महाथीर यांना जेरीस आणले. महाथीर यांचे कट्टर विरोधक असलेल्या माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांच्याशी यासीन यांनी हातमिळवणी केली. नजीब यांच्यावर गैरप्रकाराचे अनेक आरोप व खटले आहेत. त्यांचा पक्ष अनेक वर्षे मलेशियात सत्तेत होता.
दोन आठवड्यांपूर्वी संसदेचे विशेष अधिवेशन झाले. त्यात राजे सुलतान शाह यांचे अभिभाषण होऊन संसद जुलैपर्यंत तहकूब केली गेली. तोपर्यंत राजकीय जुळवाजुळव अन् फोडाफोडीला यासीन यांना पुरेपूर संधी तेथील सुलतानांनी मिळवून दिली, असेच म्हणावे लागेल. नव्या सरकारने करोनामुळे सामाजिक विलगीकरणाचे नवे नियम जारी केले. यात राजकीय निषेध सभा व सरकार विरोधी प्रदर्शनावर बंदी घातली. एकप्रकारे ही महाथीर समर्थकांची मुस्कटदाबीच म्हणावी लागेल. यासीन यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे मलेशियात लोकशाही टिकेल का? पुन्हा जुनी राज्यपद्धती येईल की काय, अशी शंका आंतरराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे.
पंतप्रधान यासीन यांनी चार दिवसांपूर्वी सत्तारूढ पक्षाच्या चेअरमन पदावरून महाथीर यांची हकालपट्टी केली. शिवाय त्यांच्या मुलासह चार खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. महाथीर यांनी ही हकालपट्टी बेकायदा आहे, असे म्हणून आपणच अध्यक्षपदी कायम असल्याचा दावा केला आहे; परंतु मलेशियाच्या राजकारणाचे वारे विरोधात वाहत असल्याने व सुलतान शाह यांची भूमिका महाथीर यांच्याविषयी नकारात्मक असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त झाल्याचे मानले जात आहे.
महाथीर यांनी सत्तेत आल्यापासून पाकिस्तानशी खूप जवळीक साधली होती. पाक पंतप्रधान तर त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळीत असत. महाथीर त्यांना आदर्श वाटत. तुर्कस्थानचे राष्ट्रपती रजब तय्यब ओर्दोगण यांनी पुढाकार घेऊन पाकिस्तान, इराण, कतार व मलेशिया यांची मोट बांधली होती. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला आव्हान देत इस्लामी राष्ट्रांची नवी संघटना उभारण्याचा मनसुबा
ओर्दोगण व महाथीर यांनी वारंवार बोलून दाखविला होता. 370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील स्थितीविषयी त्यांनी भारतावर वारंवार टीका केली होती.
“सीएए’ विरोधात ते थेट युनोच्या आम सभेत भारतावर घसरले. काश्मीरवर भारताने कब्जा केल्याचा आरोप त्यांनी युनोच्या सभेत केल्यावर भारताने राजकीय प्रत्युत्तर तर दिलेच शिवाय पामतेलाची आयात थांबवून मलेशियाच्या आर्थिक नाड्या आवळल्या. मलेशिया ट्रेड युनियन कॉंग्रेसने सरकारची मनधरणी करीत यातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. महाथीर यांच्यामुळे भारताशी बिघडलेले राजकीय संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न व अग्रक्रम नवीन सरकारचा दिसत आहे, ही भारतासाठी दिलासादायक बाब होय. “तेल गेले, अन् तूपही गेले’, अशी महाथीर यांची अवस्था झाली आहे. जगातील सर्वात बुजुर्ग नेते अशी ओळख असलेले महाथीर (वय वर्षे 95) या राजकीय कडेलोटचा कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
– आरिफ शेख