शेअरबाजार आणि रिअल इस्टेट बाजार करोनामुळे हेलपाटून गेला होता. शेअरबाजार मार्चनंतर तर खूपच कोसळला होता. त्यानंतर हळूहळू तो सावरायला लागला; परंतु अगोदरच्या तुलनेत हे सावरणे कमीच आहे. त्यामुळे सोन्याकडे लोक गुंतवणुकीचे पर्यायी साधन म्हणून वळू लागले असून, सोन्याचे भाव दहा ग्रॅमला सुमारे 53 हजार रुपयांच्या घरात गेले आहेत. मात्र, जुलै महिन्यात जपानची अर्थव्यवस्था कमालीची आक्रसली, तसेच अमेरिकेतील दुकानांमधून होणारी किरकोळ विक्री खूप कमी झाली. त्यामुळे सोन्याचे भावही वायद्यामध्ये किंचित नरमच पडले आहेत.
करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. या कारणाने एकूण माल व सेवांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. भारतात मात्र सोन्याची आयात वाढू लागली असून, ही उल्लेखनीय बाब मानावी लागेल. जुलै 2019च्या तुलनेत जुलै 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत 4.2 टक्के वृद्धी झाली. एकूण 1.78 अब्ज डॉलर्सची आपण सोन्याची आयात केली. नोव्हेंबर 2019 नंतर एवढी वाढ प्रथमच झाली आहे. भारतीय लोकांना आणि खासकरून महिलांना दागदागिन्यांची आवड भारी. पण त्या प्रमाणात इथे उत्पादन कमी होते. त्यामुळे 2018-19 सालात भारताने 1 हजार 664 किलो सोन्याचे उत्पादन केले, तर 9 लाख 82 हजार किलो सोन्याची आयात केली. याचा अर्थ आपण जे सोने वापरतो, ते जवळपास सर्वच आयात केलेले असते. करोनाचे संकट नसते, तर यापेक्षा जास्त आयात झाली असती.
एप्रिल आणि मे मध्ये भारताने अनुक्रमे 28 लाख डॉलर्स आणि 760 लाख डॉलर्स इतक्या किमतीचे सोने आयात केले. उलट जून महिन्यामध्ये 61 कोटी डॉलर्स आणि जुलै महिन्यात पावणेदोन अब्ज डॉलर्स किमतीचे सोने आयात करण्यात आले. याचा अर्थ, आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले असून, त्यामुळे लोकांची सुवर्ण खरेदी वाढू लागली आहे. म्हणूनच सोन्याचे व्यापारी भविष्यकालीन अंदाज बांधून सोन्याची आयात करण्याचे करार करू लागले आहेत. मार्चच्या मध्यानंतर ते जून अखेरपर्यंत कडक टाळेबंदीमुळे सोन्याचे भाव 19 टक्क्यांनी वाढले. जुलैत भावात जवळपास 11 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे, गुंतवणूकदारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केली जाऊ लागली. गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफमध्ये यंदाच्या जुलै महिन्यात 921 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यापूर्वी गेल्या फेब्रुवारीत आणि त्यापूर्वी सप्टेंबर 2011 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये इतक्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. या विशिष्ट दोन महिन्यांत अनुक्रमे 1 हजार 483 कोटी आणि 988 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती. गोल्ड ईटीएफकडे त्यात होणाऱ्या गुंतवणुकीच्या मूल्याचे सोने प्रत्यक्षात असणे, हे बंधनकारक असते. त्यामुळे या फंडात निव्वळ आवक वाढल्यास सोन्याची मागणीही वाढते आणि ती पूर्ण करण्यासाठी तेवढी आयात करावी लागते.
गेल्या दोन दशकांतील सोन्याच्या आयातीकडे नजर टाकल्यास, 2011 ते 2013 या काळात सात वेळा मासिक आयात विक्रमी प्रमाणात वाढली होती. तेव्हा सोन्याचे भाव 50 टक्क्यांनी वधारले होते. यंदाच्या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात अंदाजे 37 टक्क्यांच्या आसपास भर पडली आहे. परंतु 2011 व 2013 साली जेवढी वाढ झाली होती, तेवढी आता झालेली नाही. करोनाच्या महामारीमुळे लोकांच्या उत्पन्न व मागणीवर झालेला विपरीत परिणाम, हे याचे कारण आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत सोन्याच्या किमती पाच वर्षांच्या उच्चांकावर गेल्या असतानाही, सोने आयात 84 टक्क्यांनी वाढली होती. सुवर्णकारांकडून लग्नसराईसाठी सोन्याचा साठा करून ठेवण्यात येत असल्यामुळे ही आयात वाढली होती.
लग्नसराईच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षी मे महिन्यात अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त होता आणि निवडणुकाही होत्या. निवडणुकांमुळे बाजारात पैसा येतो. त्यात सरकारने शेतकऱ्यांना 750 अब्ज रुपये वितरित केले आणि करदात्यांना 185 अब्ज रुपयांची करसवलत दिली. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढली होती. मात्र 2018-19 या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत तीन टक्क्यांची घट होऊन, ती 32 अब्ज डॉलर्स इतकी झाली. सोन्यावरील आयात शुल्क वाढवले गेले. त्याचबरोबर आयात केलेल्या सोन्याचा काय उपयोग केला जातो, यावर देखरेख ठेवली गेली. सोन्याच्या तस्करीस लगाम घालण्यात आला. शिवाय जागतिक बाजारात सोन्याचे दर तेव्हा तुलनेने कमी होते. त्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट आटोक्यात राहिली.
जगात सर्वात जास्त सोने दक्षिण आफ्रिकेत आढळते. जोहान्सबर्गमध्ये जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. सोन्याची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाण भारतात कोलार येथे आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोतही सोन्याच्या खाणी आहेत. सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. लंडन बुलियन मार्केटमध्ये सकाळी साडेदहा व दुपारी तीन वाजता, अशी दोनदा सोन्याची किंमत ठरवली जाते. त्याला “लंडन गोल्ड फिक्स’ असे म्हणतात.
कर्नाटकाच्या हुत्ती, उती आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी येथील सोन्याच्या खाणीतील उत्खनन घटल्यामुळे आणि कोलार खाण बंद करण्यात आली असल्यामुळे, आपले उत्पादनच कमी झाले आहे. भारताकडे एकूण 600 अब्ज डॉलर्स किमतीचे सोने असून, ते बऱ्याच प्रमाणात नागपूरच्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेत ठेवण्यात आले आहे. पूर्वी देशाकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणानुसार नोटा छापल्या जायच्या. म्हणजेच देशाच्या चलनाला राखीव निधी म्हणून सोन्याचा आधार होता. पण अमेरिकेने 50 वर्षांपूर्वी ही प्रथा बंद केली आणि भारतात आता चलन व सोने यांचा काहीही संबंध नाही.
भारतात सोन्याचे वेड इतके आहे की, वर्षाला 800 ते 900 टन सोने आपण आयात करतो. जगातील सोन्याच्या मागणीपैकी 25 टक्के मागणी आपल्याकडून असते. जवळपास आयातीतील दोनतृतीयांश सोने हे दागिन्यांसाठी वापरले जाते. डिझेल-पेट्रोलच्या आयातीवरील खर्चानंतर भारत सर्वाधिक आयातखर्च करतो, तो सोन्यावर. सोने खरेदी करून ते बॅंक लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा, रिझर्व्ह बॅंकेने उपलब्ध करून दिलेल्या गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करणे खूपच श्रेयस्कर. अर्थात देशाची व्यापारी तूट काबूत ठेवण्यासाठी सोन्याचा वापर व आयात कमी झाली, तर ते केव्हाही चांगले.
– हेमंत देसाई