महाराष्ट्र भाजपमध्ये धुसफूस उघड होत आहे. धुसफूस कोणाकडून होत आहे हेही महत्त्वाचे असते. अगोचरांकडून ती होत असेल तर त्याचा हेतू वेगळा असतो; पण ज्यांनी पक्षाचे काम वर्षानुवर्षे सातत्याने केले त्यांच्याकडून होत असेल तर त्या धुसफुसीचा अंतर्मुख होऊन पक्ष नेतृत्वाने विचार करावयास निंदकाचे घर दरवेळी शेजारीच असावे असा नियम नाही!
विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पक्षाने नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी यात प्रथमदर्शनी आक्षेपार्ह काही नाही. सतत त्याच त्याच लोकांना संधी दिली तर त्याने संघटनेत अनेक स्तरांवर आणि अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. एक तर ज्येष्ठांमध्ये उदासीनता निर्माण होते आणि गृहीत धरण्याची देखील प्रवृत्ती बळावते. दुसरीकडे नव्याने राजकारणात सक्रिय होणारे प्रतीक्षा करीत निराश होत राहतात आणि ती निराशा काहीदा इतक्या थराला जाते की मग ते केवळ सत्तेत कुठे सहभागी होता येईल एवढ्यावरच नजर ठेवून राहतात आणि पक्षनिष्ठेपेक्षा सत्ताकारण महत्त्वाचे मानू लागतात. त्यातून काही पक्षांचे फावते कारण अशांना पक्षांतर करून आपल्या पक्षात घेणे सोपे जाते; तथापि, दूरगामी परिणाम म्हणून राजकीय संस्कृतीला धोका निर्माण होतो. तेव्हा भाकरी फिरवत राहण्यात वरकरणी आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र भाजपमध्ये केवळ भाकरी फिरविण्यासाठी हे होत आहे का, हेतुपुरस्सर काहींचे खच्चीकरण होत आहे असा प्रश्न निर्माण व्हावा इतकी धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे.
विधानपरिषद उमेदवारी नाकारल्यानंतर प्रामुख्याने ज्यांची निराशा प्रकट झाली ते एकनाथ खडसे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. वस्तुतः खडसे दीर्घकाळ नाराज आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते पक्षांतर करतील अशा वावड्या देखील उठल्या होत्या. त्यांनी त्यावेळी आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत असे जाहीर करून चर्चेवर पडदा टाकला. तेव्हा आता त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर करण्यात येईल अशा चर्चांना उधाण आले होते. प्रत्यक्षात खडसे आणि त्यांच्याबरोबर तावडे आणि मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यापैकी तावडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती आणि मुंडे पराभूत झाल्या होत्या. तेव्हा हे तिघेही पक्षात एके काळी प्रभावशाली असणारे होते आणि आता एका अर्थाने पक्षाने त्या तिघांना निष्प्रभ केले आहे. खडसे यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आणि थेट फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. राम शिंदे यांची नाराजांमध्ये भर पडली आहे. त्यानंतर फडणवीस यांची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी.
विशेष म्हणजे भाजप हा अनुशासनासाठी प्रख्यात पक्ष असूनही ही धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला आणि नाराजांच्या आणि मुख्य म्हणजे खडसे यांच्या नाराजीचा खरपूस समाचार घेतला. पक्षाने ज्यांना दहा पैकी नऊ वेळा दिले त्यांनी एकदा काही मिळाले नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही; मुंगी होऊन साखर खावी; इत्यादी बोधप्रद विधाने करून त्यांनी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुलाखती देताना पाटील अतिशय आक्रमकपणे नाराजांचा समाचार घेत होते. ज्या वेळी खडसे यांना उमेदवारी दिली तेव्हा कोणी तरी नाराज झालेच असेल; त्यांना खडसे यांनी जे समजावले ते आता स्वतःला समजवावे असेही ते म्हणाले. कोण कोणाच्या जवळचा हे बघून उमेदवारी दिलेली नाही असा दावा त्यांनी केला. एकूण पाटील यांनी फडणवीस यांची ढाल बनण्याची भूमिका स्वीकारली. पक्ष संघटन संभाळणाऱ्याला कधी कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप द्यावी लागते आणि कधी छडी उगारावी लागते. त्यात विशेष काही नाही. तथापि, त्यांनी यावेळी छडी उगारली ती नवोदितांचा अवखळपणा नियंत्रणात यावा म्हणून नाही तर ज्येष्ठांच्या नाराजीला लगाम घालण्यासाठी. त्यातूनच भाजपमध्ये महाराष्ट्राच्या स्तरावर सगळे काही अलबेल नाही असे चित्र आहे.
पाटील यांना भाजपचा इतिहास काय माहीत असा प्रतिसवाल खडसे यांनी केला आहे. भाजपची पक्षांतर्गत राजकीय संस्कृती पूर्वीसारखी निष्ठावान कार्यकर्ता-अधिष्ठित राहिलेली नाही हे नाकारता येणार नाही. निवडणुकीच्या अगोदर घाऊक प्रमाणात पक्षांतरे घडवून आणून भाजपने त्या आयारामांना उमेदवारी दिली होती आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना ती नाकारली होती तेव्हाच पक्ष केवळ सत्ता मिळविणे एवढ्याच एकमेव उद्दिष्टात बंदिस्त झाला आहे हे उघड झाले होते. अर्थात त्यापैकी अनेक आयारामांना मतदारांनी दणका दिला हेही खरेच. स्वबळावर बहुमत मिळाले नाही तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजपने केला तो अगोचरपणा होताच; पण सत्ता हेच उद्दिष्ट झाल्याचा तो दुसरा पुरावा होता.
तेव्हा याच पद्धतीत पक्षांतर्गत विरोधक निष्प्रभ करणे हेही ओघाने आलेच. मुंडे किंवा खडसे यांनी वारंवार जाहीर नाराजी प्रकट केल्याने भाजप नेतृत्वाने त्यांना शिक्षा म्हणून उमेदवारी नाकारली असे म्हटले जाते. ते खरे आहे असे मानता येईलही. परंतु त्यातून दुसरा असा प्रश्न उद्भवतो की जे एक दिवस अगोदरपर्यंत पक्ष आणि पक्ष नेत्यांवर जाहीरपणे टीका करीत असतात त्यांनाच एका रात्रीत पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाते हा केवळ विरोधाभास नव्हे तर वावदूकपणा देखील नव्हे काय? पक्ष नेतृत्वाने काय करावे, कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाला नाकारावी, उमेदवारी देताना काय निकष लावावे हे पक्षांतर्गत विषय आहेत हे मान्य केले पाहिजे. तथापि, पक्षांतर्गत विषयांची कसोटी मतदानाच्या मैदानात लागत असते हेही विसरता येणार नाही. आयारामांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली त्यातील किती जण पराभूत झाले याचा धांडोळा भाजपने घेतला तर चंद्रकांत पाटील यांच्या आक्रमकतेतील आणि खोचकपणातील फोलपणा दृगोच्चर होईल. प्रश्न खडसे, मुंडे किंवा तावडे यांचा नाही. प्रश्न निकषांमधील प्रामाणिकपणाचा आहे.
– राहुल गोखले