खटाव -करोनाच्या कहरामुळे जगचं हादरून गेले आहे. खटाव- माण तालुक्यातील विशेषत: माण परिसरातील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी जिल्ह्यात, परजिल्ह्यातही दूरवर भटकंती करतात. मात्र, करोनाचे सावट मेंढ्या व मेंढपाळावरदेखील पडल्याचे निदर्शनास येत आहे. करोनाच्या संकटामुळे मेंढपाळांनी आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली आहे.
वणवण भटकणाऱ्या मेंढपाळाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मेंढ्या हेच आहे. याचसाठी ते खूप दूरवर आपल्या मेंढ्यांसह भटकंती करतात. हे मेंढपाळ मेंढ्या घेऊन साधारणपणे पावसाळा सुरू झाला की आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करतात. ऐन उन्हाळ्यात खटाव, माणसारख्या दुष्काळी भागात मेंढ्यांना खाण्यासाठी आवश्यक प्रमाणात चारा उपलब्ध होत नाही व पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. खटाव, माण भागात पाऊस सुरू झाला की मेंढ्यांना खाण्यासाठी माळरानावर मुबलक गवत येते व पाण्याचा प्रश्नही सुटत असतो. या वेळी मात्र वेगळेच चित्र आहे. करोनाच्या भीतीने मेंढपाळ चांगलेच धास्तावलेले दिसत आहेत.
करोनाचा विषाणू जिल्ह्यासह इतर ठिकाणी वेगाने पसरत आहे. खटाव-माण तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मेंढपाळसुद्धा “गड्या आपला गाव बरा’ म्हणत आपल्या मायभूमीच्या ओढीने गावाकडे मार्गस्थ होत आहेत. काही मेंढपाळांकडे शेतीही आहे. पण कोरडवाहू म्हणजे पूर्णपणे पावसावर अवलंबून. या भागातील पावसाचे प्रमाण कमी आहे. या भागातील विशेषतः धनगर समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय मेंढीपालन हाच आहे.
अलीकडील काळात मात्र मुलांच्या शिक्षणाचे व शासकीय नोकरीचे प्रमाण काही अंशी वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे मेंढीपालनावर अवलंबून आहे. अशा कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. करोनाच्या धास्तीने मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन लवकर देशावर चालले असले तरी इच्छीत स्थळी पोचल्यावर मात्र त्यांच्यासमोर मेंढ्याच्या चारा- पाण्यासह अनेक प्रश्न आ वासून उभे राहणार आहेत.