नवी दिल्ली: छत्तीसगड मधील उद्योगपतींनी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील पीएम केअर्स फंडाला दिलेल्या देणग्या राज्य सरकारला परत कराव्यात अशी अधिकृत मागणी छत्तीसगड सरकारतर्फे केंद्र सरकारला करण्यात आली आहे. हे पैसे आमच्या राज्यातील जनतेचे आहेत असेही छत्तीसगड सरकारने केंद्राला बजावले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीच आज ही माहिती दिली.
ते म्हणाले की, छत्तीसगड राज्यातील अनेक उद्योगपतींनी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी या निधीतून पंतप्रधानांच्या पीएम केअर्स फंडाला मोठी आर्थिक मदत केली आहे. या निधीचे काय झाले याची विचारणा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. खुद्द छत्तीसगड सरकारने त्यांच्या मुख्यमंत्री निधीत जमलेल्या निधीचा तपशील जनतेला जाहीर केला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानांनाही या फंडात जमलेल्या निधी विषयी माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पीटीआयशी बोलताना केली.
या निधीचा तपशील लपवण्याचे कारण काय अशी विचारणाही त्यांनी केली. या निधीचा तपशील मागवण्याचा अधिकार देशवासियांना आहे आणि त्यांनी तो दिलाच पाहिजे असे ते म्हणाले. या निधीसाठी छत्तीसगडमधून देण्यात आलेल्या देणग्या आम्हाला परत द्या, अशी मागणी मी खुद्द मोदींकडेच केली आहे, असे ते म्हणाले.