नवी दिल्ली :- विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्याचे टाळून सरकार संसदेत अन्य विविध प्रस्ताव मांडत आहे. हा संसदीय कामकाज पद्धतीचाच अवमान आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
चौधरी म्हणाले की, सरकारने आधी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करायला हवी. आम्ही मणिपूरला जाऊन तेथील विदारक स्थितीचा अनुभव घेऊन आलो आहोत. आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही मणिपूरला जाऊन तेथील स्थिती अनुभवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मणिपूरबाबत सरकारने अजून चर्चाही होऊ दिलेली नाही किंवा पंतप्रधानही यावर संसदेत येऊन बोललेले नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांना संसदेत बोलायला लावण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. पण अजून सरकारने त्यावर चर्चा सुरू केलेली नाही.
आम्ही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून त्यावर लोकसभेत चर्चा सुरू झाली पाहिजे. सभागृहात इतर कोणत्याही सरकारी कामकाजावर चर्चा करण्यास आमचा आक्षेप नाही, पण अविश्वास प्रस्तावावर आधी चर्चा सुरू झाली पाहिजे.
चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. अविश्वास प्रस्तावाला स्वतःचे महत्त्व आहे आणि जर सरकार अविश्वास प्रस्तावावरील चर्चा टाळून इतर सर्व प्रकारची विधेयके आणि धोरणे आणत असेल तर ते संसदेचा अपमान आहे असे मला वाटते असेही अधीर रंजन चौधरी यांनी नमूद केले.