कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावर संसदेत बोलले पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी चार दिवसांचा कालावधी घेतल्याची टीका त्यांनी केली. आणि त्यांचे हे वक्तव्य संसदे बाहेरचे आहे, त्यांनी यावर संसदेत बोलेले पाहिजे.
विरोधी पक्ष आणि देशातील जनतेच्या दबावामुळे मोदींनी या विषयावर मौन सोडले आणि एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यावर काही भाष्य केलेले दिसले, पण तेवढ्याने भागणार नाही त्यांनी संसदेला या प्रकरणात विश्वासात घेतले पाहिजे असा दावाही चौधरी यांनी केला.
जगात कुठेही काही घडले की पंतप्रधान ‘एक्स’वर प्रकट होतात, पण संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी चार दिवस घेतले. वास्तविक त्यांनी दुसऱ्याच दिवशी सभागृहात येऊन लोकांना काळजी करू नका, असे आश्वासन द्यायला हवे होते,असे चौधरी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बेरोजगारी आणि महागाईच्या विषयावर सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी चार जणांनी १३ डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा भेदून थेट सभागृहात हल्लाबोल केला होता. हा विषय सध्या संसद अधिवेशनात गाजतो आहे. त्यावर मोदींनी केवळ एका दैनिकाला दिलेल्या मुलाखीतत ओझरते भाष्य केले आहे त्यांनी यावर संसदेत काहीही भाष्य केलेले नाही किंवा गृहमंत्री अमित शहाही या विषयावर काहीही बोलेले नाहीत.