मुंबई – जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो. भाजपने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्याचे कोणतेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. म्हणून भावनिक भाषण केले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांच्या कालच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे आव्हानही फडणवीसांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सभागृहात भाजपवर जोरदार निशाणा साधला. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात, असे खुले आव्हानच ठाकरे यांनी विरोधकांना दिले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.
किरीट सोमय्या यांची कारवाई ही प्रतिकात्मक आहे. कुठलीही कारवाई ही संबंधित संस्था किंवा न्यायालय करते. भाजपची संघर्षाची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलतच राहणार, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. कुणाला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचे नाही किंवा कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही. तथ्यांच्या आधारावरच कारवाई होते, असे ते म्हणाले.
ठाकरे यांचे वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही 2024 ला स्वबळावर सरकार स्थापन करणार, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.