कोलकाता : दिल्लीत भाजपच्या रॅलीत गोली मारोच्या घोषणा देण्यात आल्याने तेथील वातावरण बिघडले होते व त्यातूनच तेथे दंगली भडकल्या असा आरोप होत असतानाच आज भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही कोलकाता येथील रॅलीत अशाच घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
देशके गद्दारोंकी गोली मारो सालोंको अशा स्वरूपाच्या या घोषणा होत्या. या सभेत अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सीएए कायद्याच्या विरोधात दंगली घडवत असल्याचा आरोप केला. त्यांच्या जोरकस भाषणाच्यावेळीच या घोषणा दिल्या गेल्या आहेत.
अमित शहा हे या रॅलीच्या दिशेने येत असताना या वादग्रस्त घोषणाबाजीला सुरूवात झाली. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शहांवर या प्रकरणात टीका करताना म्हटले आहे की, आम्हाला येथे येऊन प्रवचन देण्यापेक्षा दिल्ली दंगलीत ज्या 50 निरपराध लोकांचे बळी गेले त्याबद्दल खुलासा करा आणि माफी मागा अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय जनता पक्ष केवळ द्वेष पसरवण्याचे काम करीत असून तुमची बंगालला आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.