पारनेर -शिवसेना पहिल्यांदा फुटली नाही अशा अनेक घटना व राजकीय उलथापालथ झाली आहे. परंतु शिवसेना संपली नाही, संपणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हलवला. ते आज अडचणीत आल्यावर आपण त्यांना सोडायचे असे का? असा सवाल करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, असे माजी आ. विजय औटी यांनी सांगितले.
पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने तालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या सत्कारप्रसंगी माजी आ. औटी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका महिला शिवसेना आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, पारनेर शहरप्रमुख नीलेश खोडदे, नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
माजी. आ. औटी म्हणाले की, तुमच्या मनातील नाव पक्षप्रमुखांच्या आदेशाने पक्षाने जाहीर केले आहे. पंधरा वर्षांपूर्वीचा काळ, माझ्या आमदारकीच्या अगोदरचा आठवा. पंधरा वर्षे तुम्ही सुखात असल्याने दुःख काय असते हे माहीत नाही. सत्ता कुणाच्या हातात आल्यावर जनतेला न्याय मिळेल हे आपणाला कळायला लागले आहे. लोक चाणाक्ष आहेत. कोणी बोलत नाही. नागरिक योग्य वेळी काय करायचे ते करतील. दातेंनी अडीच वर्ष खूप चांगले काम केले. विकासाचा दृष्टिकोन ठेवून तालुक्याचा विकास केला.
परंतु दाते यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली हे विसरता येणार नाही. ज्याला जनतेच्या नाडीवर बोट ठेवता येते, तो नेता होतो. स्तुती करणारे भरपूर असतात. राजकारणात विश्वास मिळवणेसुद्धा खूप गरजेचे असते. राजकारण हे नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे अखंड वाहत असते. डॉ. पठारे तालुक्यात शिवसेना वाढवण्याचे काम नक्की करतील. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उघडण्याचे काम त्यांच्या हातून होईल, अशी अपेक्षा मी व्यक्त करून त्यांच्या भावी वाटचालीस व त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीला शुभेच्छा देतो, असे सांगितले.