पिंपरी – काही लोक जात-धर्माच्या माध्यमातून विद्वेष वाढविण्याचे काम करतात. आम्हाला विद्वेष नको, विकास, रोजगार पाहिजे. राज्य आणि देशाला विकासात आणखी कसे पुढे नेता येईल याचा सर्वांनी विचार करून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भोसरी येथे राष्ट्रीय एकात्मता मेळावा आणि ईद- ए मिलानच्या कार्यक्रमात बोलताना केले.
भोसरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता मेळावा आणि ईद- ए मिलानचे बुधवार (दि.11) रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, केरळचे राष्ट्रवादीचे आमदार के. थॉमस, पितांबर मास्टर, पक्षाचे राष्ट्रीय सचिव महम्मद कुट्टी, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहर प्रवक्ते आणि माजी महापौर योगेश बहल, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इमरान शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व धर्मीयांच्या प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड मिनी इंडिया आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. या मिनी इंडियाचे दर्शन ईद मिलनच्या माध्यमातून होत आहे. कोणतीही धर्म कोणाचा द्वेष करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्म बंधुभाव शिकवितो आणि विकास करण्यास सांगतो.
काश्मीर फाइल हा काय प्रकार आहे? काश्मीर हा भारताचा भाग आहे. पण, शेजारच्या देशाला मान्य नाही. काश्मीरमधील हिंदू, मुस्लिम यांच्यावर ज्या काळात हल्ले झाले. त्याकाळी देशात, राज्यात भाजपच्या पाठिंबाच्या सरकार होते. देशात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही शक्तीकडून होत आहे. चित्रपट काढून संघर्षाचे वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी जे राज्य प्रस्थापित केले ते भोसले यांचे नव्हे तर हिंदवी आणि रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. हा सोहळा आयोजित करून शहर राष्ट्रवादीने ऐक्यच्या दर्शन घडविले.