भोपाळ – एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांसाठी वेगवेगळे नियम असू शकत नाहीत’ आणि कोणताही देश दोन कायद्यांच्या आधारे चालवू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहितेचे समर्थन केले.
मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या “मेरा बूथ, सबसे मजबूत’ या मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी भोपाळमध्ये विचारले की ‘तिहेरी तलाक’ हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे का?
मग मुस्लिमबहुल देश इजिप्त, इंडोनेशिया, कतार, जॉर्डन, सीरिया, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये त्याचे पालन का होत नाही? किमान 90 टक्के सुन्नी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इजिप्तमध्ये 80-90 वर्षांपूर्वी ‘तिहेरी तलाक’ रद्द करण्यात आला होता, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.
भोपाळमध्ये पंतप्रधान म्हणाले, “जे लोक ‘तिहेरी तलाक’चे समर्थन करतात ते व्होट बॅंकेचे भुकेले आहेत आणि ते मुस्लिम मुलींवर घोर अन्याय करत आहेत…”तिहेरी तलाक’ ही केवळ स्त्रियांसाठीच चिंतेची बाब नाही, तर ही पद्धती संपूर्ण कुटुंब नष्ट करते. मोठ्या आशेने पुरुषाशी लग्न केलेल्या महिलेला ‘तिहेरी तलाक’ देऊन परत पाठवले जाते, तेव्हा आई-वडील आणि भाऊ या महिलेच्या दुरवस्थेने दु:खी होतात.
‘तिहेरी तलाक’चे समर्थन करणाऱ्यांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले, “काही लोकांना ‘तिहेरी तलाक’चा फास मुस्लिम मुलींच्या डोक्यावर लटकवायचा आहे, जेणेकरून त्यांना त्यांचे शोषण सुरू ठेवण्याचे स्वातंत्र्य मिळेल…
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सध्या चर्चेत असलेल्या समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ‘समान नागरी संहिता’ आणा असे वारंवार सांगितले पण हे लोक व्होट बॅंकेचे भुकेले आहेत… व्होट बॅंकेचे राजकारण करणाऱ्यानी मुस्लिमांचे शोषण केले आहे, पण त्यांची कधी चर्चा झाली नाही.
आजही त्यांना समान अधिकार मिळत नाहीत. भारतातील मुस्लिम बंधू-भगिनींना हे समजून घ्यावे लागेल की कोणते राजकीय पक्ष त्यांना चिथावणी देऊन त्यांचा राजकीय फायदा घेत आहेत.
समान नागरी संहितेच्या नावाखाली अशा लोकांना भडकवण्याचे काम होत असल्याचे आपण पाहत आहोत. घरात एका सदस्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल तर घर चालेल का? मग अशा दुहेरी व्यवस्थेने देश कसा चालवणार?