मुंबई :- आशिया करंडक स्पर्धेसाठी सज्ज होत असलेल्या भारतीय संघाला दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे मोठा फटका बसणार आहे. सलामीवीर लोकेश राहुल व श्रेयस अय्यर अद्याप दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेले नसल्याने त्यांना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
राहुल त्याला झालेल्या दुखापतीतून सावरत असला तरीही आशिया करंडक स्पर्धेत त्याच्या खेळण्याची शक्यता नसल्याचे बीसीसीआयनेच म्हटले आहे. त्याचवेळी दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या संपूर्ण मोसमातून बाहेर गेलेल्या अय्यरलाही आशिया करंडकात खेळता येणार नसल्याचे समोर येत आहे. या दोघांनीही शस्त्रक्रिया करुन घेतली असून अद्याप त्यांचा सरावही सुरु झालेला नाही. ते सरावासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्यावरच त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवले जाणार आहे. तेथे ते मॅचफिट होतील का हे महत्त्वाचे आहे.
एनसीएकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या माहितीनुसार दोघेही अजून पूर्णपणे तंदुरस्त झालेले नाहीत, त्यांना मॅचफिट होण्यासाठी किमान अजून तीन महिने वेळ लागेल. आशिया करंडक स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या आशिया कपमध्ये भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहे.
बुमराहबाबत पुन्हा संभ्रम…
गेल्या वर्षभरापासून भारतीय संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, एनसीएच्या अहवालानुसार तो अद्याप केवळ 70 टक्के फिट आहे. अशा स्थितीत बुमराहला आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा भाग बनवणे धोक्याचे ठरु शकते.
भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात आशिया करंडक स्पर्धेपूर्वी आयर्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. मात्र, त्यासाठी बुमराह भारतीय संघात पुनरागमन करेल का याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.