नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारल्याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नितीश यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडायला नको होते. त्यांनी चुकीची कृती केली. त्यांची वर्तणूक लोकशाहीसाठी चांगली नाही, असे टीकास्त्र केजरीवाल यांनी सोडले.
विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीतून (इंडिया) बाहेर पडून नितीश पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत सहभागी झाले. त्यावर केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
माझ्या अनुमानानुसार नितीश यांच्या निर्णयाने बिहारमध्ये एनडीएचेच नुकसान होईल. त्याउलट, इंडियाला राजकीय लाभ मिळेल, असा दावाही त्यांनी केला. आप हाही इंडियाचा घटक आहे.
त्या आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसशी सध्या आपची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात, गोवा आणि हरियाणा या पाच राज्यांत जागावाटपाचा समझोता व्हावा अशी आपची आग्रही भूमिका आहे.
मात्र, पंजाबमधील दोन्ही पक्षांचे नेते स्वबळावर लढण्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि आपचे जमणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी इंडियाबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.