Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत राज्याच्या विधानसभेत असे विधान केले, ज्यामुळे बिहारमध्येच नव्हे तर देशभरात गदारोळ सुरु झाला आहे. भाजपने तर नितीशकुमार यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी टीका करताना भाजपने,”आजकाल त्यांच्या (नितीश कुमार) मनात ‘बी ग्रेड’ चित्रपट आहेत,” असे म्हटले आहे.
नितीश कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सीएम नितीश यांच्या वक्तव्यावर टीका करत,’या देशातील प्रत्येक महिलेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने मी नितीश कुमार यांना त्वरित आणि स्पष्ट माफी मागण्याची विनंती करते. विधानसभेत त्यांनी केलेली असभ्य टिप्पणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अपमान आहे, ज्याची प्रत्येक स्त्री पात्र आहे. नितीशकुमार यांची भाषा अत्यंत अपमानास्पद आणि वाईट आहे. लोकशाहीत एखाद्या नेत्याने उघडपणे अशी विधाने केली तर राज्यातील महिलांची काय अवस्था असेल याची कल्पना येऊ शकते. या विधानाचा मी निषेध करते,” असे म्हणत त्यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली.
#WATCH | Bihar CM Nitish Kumar uses derogatory language to explain the role of education and the role of women in population control pic.twitter.com/4Dx3Ode1sl
— ANI (@ANI) November 7, 2023
तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर भाजपने ट्विट करत,”कोणी इतके घाणेरडे असू शकते का? बिहार विधानसभेनंतर नितीशकुमार यांनी विधानपरिषदेत स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा घृणास्पद आणि खालच्या पातळीवरील शब्दांत पोस्टमार्टम करून त्यांचे चारित्र्य आणि खरा चेहरा उघड केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली त्यांनी महिलांप्रती आपल्या घाणेरड्या विचारसरणीचा दाखला दिला आहे. असल्याचे म्हणत टीका केली आहे.
दरम्यान, नितीशकुमार यांनी विधानसभेत बोलताना लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी,”सुशिक्षित महिला आपल्या पतीला लैंगिक संबंध ठेवण्यापासून कसे रोखू शकते. याविषयीचे वक्तव्य केले आहे. यावेळी नितीश कुमार म्हणाले, “पतीच्या कृतीमुळे जास्त मुले जन्माला येतात. तथापि, सुशिक्षित स्त्रीला हे कसे थांबवायचे हे माहित आहे … म्हणूनच अपत्याच्या जन्माची संख्या कमी होत आहे.”असे त्यांनी म्हटले होते.