Nitish Cabinet : बिहारच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानाला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महागठबंधनशी नाते तोडून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्याने राज्यात जदयू-भाजपचे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. या सरकारमध्ये एकूण नऊ नावांना मंजुरी देण्यात आली असून या आघाडीत नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार आहेत.
नितीशकुमार यांच्या नव्याने निर्माण होणाऱ्या मंत्रिमंडळात ८ मंत्र्यांना स्थान देण्यात येणार आहे. दरम्यान, बिहारमध्येही भाजपने दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असाच फॉर्म्युला चालवला आहे. त्यात भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, जेडीयूकडून विजेंद्र यादव, अपक्ष सुमित कुमार सिंह आणि ‘हम’मधून संतोष कुमार सुमन यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
एनडीए सरकारमधील हे नवे समीकरण
बिहारच्या राजकारणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचीही घोषणा करण्यात आली असून, ते आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाच्या नव्या समीकरणात नितीश वगळता जेडीयूला तीन आणि भाजपला तीन मंत्री मिळाले आहेत. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या ‘हम’लाही स्थान मिळाले असून एकमेव अपक्ष सुमित कुमार सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
सायंकाळी पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार
नितीश यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात होणार आहे. त्याबाबतची तयारीही सुरू झाली आहे. आमंत्रणेही देणे सुरू झाले आहे. मंत्रिमंडळात असणाऱ्या सर्व नेत्यांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि माजी विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा हेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी बिहारमध्ये या बदलाने जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.