Devendra Fadnavis : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. दरम्यान, काल (दि. 27 जानेवारी) गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरागेंच्या या मागणीवर मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. 28 जानेवारी) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अंतरवलीसराटीसह राज्यात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचं तुम्ही म्हणता.
पण सरसकट गुन्हे मागे घेणार नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर तुमचं मत काय आहे? असा सवाल मनोज जरांगे यांना करण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, “मग हे आंदोलन सुरू राहणारं… आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. दणका सुरूच राहील’, असा इशाराच मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिला आहे.
‘गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत…’ – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यामध्ये आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, घरे जाळणं, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.