मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना समृद्धी महामार्ग विदर्भ-मराठवाड्यासाठी वरदान ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एमएसआरडीसीचेही आभार मानले. मात्र, यावेळी नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळालं आहे.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, “या महामार्गाला जोडून आम्ही औरंगाबाद ते पुणे दरम्यान महामार्ग बनवणार आहोत. लवकरच या कामाची सुरुवात होईल. या महामार्गामुळे नागपूर ते पुणे अंतर केवळ सहा तासांत पूर्ण होईल. याचबरोबर आम्ही सुरत चेन्नई, इंदौर-हैदराबाद, हैदराबाद-रायपूर, नागपूर-विजयवाडा आणि पुणे-बंगळूरू असे आणखी सहा महामार्ग बनवणार आहोत. हे महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहेत.’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत दर्शविला विरोध….
या लोकार्पण सोहळ्यास सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याचं दिसून आलं. यावेळी शेतकऱ्यांनी वावी येथे समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवत आपला विरोध दर्शविला. समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतांमध्ये जायला रस्ते नाहीत, पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरते, समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित करण्यात येत आहेत. असं यावेळी शेतकरी म्हणाले.