- लष्कर, हवाई दल आणि नौसेना सज्ज
- खानदेशातही अतिसतर्कतेचा आदेश
मुंबई : निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने घोंगावत येत असताना त्याच्या थेट मार्गात येणाऱ्या आण्विक आणि रासायनिक प्रकल्पांबाबत काळजी व्यक्त करण्यात येत आहे. हे वादळ महाराष्ट्रात मंगळवारी उत्तररात्री किंवा बुधवारी सकाळी धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना वादळासाठी रेड ऍलर्ट देण्यात आला आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्यात आणि हवामान खात्यात समन्वयासाठी यंत्रणा निर्मान करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाची तीव्रता आणि दक्षतेचे उपाय यांचा आढावा घेतला.
खबरदारी घेत आहोत : मुख्यमंत्री
वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यातील आण्विक आणि रासायनिक प्रकल्पांना धोका होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे देशातील सर्वात जुना आण्विक वीज प्रकल्प आहे. तर मुंबईत डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राचा प्रकल्प आहे. रायगडमध्ये उर्जा, पेट्रोलियम, केमिकल आणि अन्य महत्वाचे उद्योग आहेत. याशिवाय मुंबईत मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि नौदलाचा महत्वाचा तळ आहे.
पक्की घरे नसणअऱ्याचे स्थलांतर
दरम्यान पक्की घरे नसणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर सखल भागागतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना स्थलांतरीत केले आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील 50 करोनाबाधितांना गोरेगावच्या नेस्को रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हवामान खात्याशी समन्वय
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला तैनात करण्यात आले आहे. पूर्णवेळ कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. लष्कर, हवाई दल, नौदल आणि भारतीय हवामान खात्याला परस्परांच्यात समन्वय ठेवण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
निसर्ग वादळामुळे होणारी अतिवृष्टी आणि येणारा पूर यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी पाच पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे पश्चिम नौदल कमांडने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात वादळाला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी केली असून सखल क्षेत्रातील लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे.
रेड अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड ऍलटू दिला आहे. रत्नागिर अिाणि सिंधूदूर्ग जिल्ह्यातही अतीसतर्कतेची सूचना दिली आहे.
अतीमुसळधार पावसाची शक्यता अधिक
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव भारत भूमीवर तीन ते सहा जून या कालावधी पर्यत राहणार आहे.या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसणार आहे. महाराष्ट्रात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तीन व चार जून दरम्यान राहणार आहे. या वादळातील वाऱ्याचा वेग हा 100 ते 110 किलोमीटर इतका आहे. वादळाचे जे टप्पे असतात त्यानुसार हे सौम्य वादळ असणार आहे, वाऱ्याचा वेग जरी कमी असला तरी वादळामुळे एकत्रित झालेले बाष्प हे मोठ्या संख्येने असल्याने अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज अधिक आहे. मान्सूनचे सर्व ढग एकत्रित झाल्याने त्याचा परिणाम अधिक होणार आहे.
विमाने सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू
चक्रीवादळाचा मुंबईला असणारा धोका लक्षात घेता शहर आणि उपनगरामध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. वादळामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने विमानतळावरील विमाने सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत. त्याचबरोबर घातक रसायने ज्या कारखान्यांमध्ये वापरली जातात अशा कारखान्यांनी आपल्याकडील रसायने सुरक्षित स्थळी ठेवावीत असे आदेश देण्यात आले आहेत.
शहराच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत, त्याचबराबेर ज्यांची घरे कच्ची व जूनी झाली आहेत त्यांनी घरे तातडीने खाली करावीत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. शहरातील खासगी आणि सरकारी हॉस्पिटलांना सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.