नवी दिल्ली : देशातील पीएनबी घोटाळ्यात सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. कारण सक्तवसुली संचलनालयाने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधित कंपन्यांमधील तब्बल २ हजार ३०० किलोपेक्षा अधिक सोने भारतात आणले असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
दरम्यान, या सर्व दागिन्यांची किंमत १ हजार ३५० कोटी रूपयांच्या जवळपास आहे. यामध्ये पॉलिश्ड डायमंड, पर्ल आणि सिल्व्हर ज्वेलरीचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हे सर्व हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात ठेवण्यात आली होती. मुंबईमध्ये आलेल्या १०८ कंसायमेंट्सपैकी ३२ हे नीरव मोदीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांचे आहेत. तर उर्वरित हे मेहुल चोक्सीच्या कंपनीचे आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कंसायमेंट्स आता पीएमएलए अंतर्गत अधिकृतरित्या जप्त करण्यात येणार आहे. तसंच ईडीने हाँगकाँगमधील सर्व कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर ही ज्वेलरी भारतात आणण्यात आली आहे. यापूर्वीही सक्तवसूली संचलनालयानं दुबई आणि हाँगकाँगमधून ३३ कंसायमेंट्स भारतात आणले होते. तेदेखील नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या कंपन्यांचेच होते. ते कंसायमेंट्स आल्यानंतर त्याचं मूल्यांकन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते जप्त करण्यात आले. स्वतंत्र मूल्यांकन करणाऱ्याने त्याची किंमत १३७ कोटी रूपये असल्याचे म्हटले होते.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात सध्या तपास सुरू आहे. मुंबईतील पीएनबी बँकेच्या २०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीप्रकरणी हा तपास सुरू आहे. मुंबईतील एका विशेष न्यायालयाने सोमवारी नीरव मोदीची संपत्ती ‘एफईओए’ या कायद्याअंतर्गत जप्त करण्याचे आदेश दिले होते. हे देशातील असं पहिलं प्रकरण आहे, जेव्हा न्यायालयानं ‘एफईओए’ या कायद्याअंतर्गत कोणाच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले आहेत.