तळेगाव ढमढेरे – निमगाव- म्हाळुंगी आणि कासारी गावाला 29 तारखेच्या अगोदरच कालवा क्रमांक 13 मायनर 7 च्या लघु आवर्तनेतून पाणी सोडण्यात आले. मात्र, दुसऱ्यादिवशी पाणी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे निमगाव- म्हाळुंगी आणि कासारी गावातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी व कासारी गावांना (दि.25) पासून 29 तारखेपर्यंत चासकमानच्या कालवा क्रमांक 13 मायनर 7 च्या लघु आवर्तनेतून 25 तारखेला सोडले होते. परंतु ते पाणी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दुसऱ्या दिवशी बंद केले. शेतकऱ्यांना पाणी बंद करण्याची पूर्वकल्पना न देता पाणी बंद केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शेळके यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला. या भागात 1972 च्या दुष्काळामध्ये पाझर तलाव बांधला होता. यामधून नवले पाझर तलाव, नागवडे पाझर तलाव, गाव पाणी पुरवठा विहीर, सोरटाईमळा, गुंजाळढवरा, काळे वस्ती, चव्हाण वस्ती या भागांना सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाला कळवले होते. पाटबंधारे विभागातील माधव शेळके यांनी दोन गावांना सहा दिवसांचे आवर्तनाचे पाणी फक्त दीड दिवसामध्ये बंद केले. शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी पाणी मागणीसाठी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी राजेंद्र भावसार यांच्याशी पाणी प्रश्नांवर चर्चा केली. परतीच्यावेळी 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या दोन्ही गावांना पाणी देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन काळे यांना दिले. दरम्यानच्या काळात निमगाव म्हाळुंगीचे सरपंच ज्योती शिर्के, कासारीचे सरपंच सुनीता भुजबळ यांच्यासह शेतकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पाणी मागणी नसल्याने निमगाव म्हाळुंगी, कासारी शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करता आले नाही. तरीही शेतकऱ्यांनी सहकार्य करून पत्रव्यवहार करा. आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार पाठवतो.
– राजेश भावसार,
उपविभाग अभियंता, चासकमान कालवा विभाग, शिक्रापूर.