संगमनेर (प्रतिनिधी) – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराचे जाळं उभं केलं असून त्यांच निळवंडे कालव्याचे स्वप्न 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त मालपाणी लॉन्स येथे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगमनेर तालुक्यात जन्माला आले नसते, तर संगमनेर तालुका विकासापासून कोसो दूर राहिला असता, त्यांच्या मूळे तालुक्यातील सहकाराचे जाळे मजबूत झाले आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विकास कामांना अधिक गती देण्याचे काम करत आहेत. तसेच भाऊसाहेब थोरात यांनी सुरुवात केलेले निळवंडे कालव्याचे काम 2024 पर्यंत आम्ही पूर्ण करणार असल्याचे आश्वासन ही पाटील यांनी दिले.
यावेळी सहकार,समाजसेवा,पर्यावरण,या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने जेष्ठ विचारवंत व संपादक संजय आवटे यांना गौरविण्यात आले. तसेच कृषी,शिक्षण,साहित्य, व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना गौरविण्यात आले. आणि आदर्श सहकार व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा थोरात कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.माधवराव कानवडे यांना देण्यात आला आहे.
यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री .भूपेश बघेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे उपस्थितीत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा झाला.यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.