मुंबई – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण.! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
कसा आहे महाराष्ट्राचा अहवाल…
2018-19 मध्ये करण्यात आलेल्या या गणनेमध्ये देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रातील 2.4 दशलक्षाहून अधिक जलाशयांची मोजणी करण्यात आली होती. देशभरात मोजण्यात आलेल्या 24,24,540 जलाशयांपैकी, 97.1% (23,55,055) जलाशय ग्रामीण भागात आहेत आणि केवळ 2.9% (69,485) जलाशय शहरी भागात आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 97,062 जलाशयांची मोजणी करण्यात आली असून त्यापैकी 99.3% म्हणजे 96,343 जलाशय ग्रामीण भागात आहेत तर उर्वरित 0.7% म्हणजे 719 जलाशय शहरी भागात आहेत. महाराष्ट्रात 574 नैसर्गिक आणि 96,488 मानव-निर्मित जलाशय आहेत.
तसेच जलसंवर्धन योजना राबवण्यात व यशस्वी करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. या अहवालानुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जलसाठे आहेत.तर पाण्याच्या टाक्यांच्या संख्येचा विचार करता आंध्रप्रदेश आघाडीवर असून देशातील सर्वाधिक तलाव तामिळनाडू राज्यात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद !
”केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होत असून जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार,
मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे,तसेच आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे”,असे आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.