कागवाड (बेळगाव) – सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेस हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे राजकारण करते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी कर्नाटकात धर्माच्या आधारे चार टक्के आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. भारताच्या इतिहासात सत्तेत येण्यासाठी धर्माचा वापर करणारा कोणता पक्ष असेल, तर तो कॉंग्रेस आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कागवड येथे एका निवडणूक सभेमध्ये राजनाथ सिंह बोलत होते. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आरक्षण दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू, पण भारतीय राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नाही, हे येथे लक्षात घेतले गेले पाहिजे. तुम्ही (कॉंग्रेस) काय करत आहात? तुम्हाला जात, पंथ आणि धर्माच्या आधारे देशाची फाळणी करायची आहे का?
राजनाथ सिंह असेही म्हणाले की, कॉंग्रेस भारतीय संविधानाच्या आत्म्याविरुद्ध काम करत असते. कॉंग्रेसने 1975 साली घटनादुरुस्ती करून आणि देशात आणीबाणी लादून लाखो लोकांना तुरुंगात टाकून राज्यघटनेचा अनादर केला होता. भाजपचा विचार करता आम्ही खरे बोलतो आणि त्यानुसार वागतो. राजकारणाचा अर्थ केवळ सरकार बनवणे नसून समाज आणि राष्ट्र निर्माण करणे आहे. भाजप सत्तेत असो वा नसो, असे पाप आम्ही कधीच करणार नाही. आम्ही देशाच्या भावनेविरुद्ध काम करू शकत नाही. ही आमची विचारसरणी आहे.
दरम्यान, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर, राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारने इतर मागासवर्गीयांच्या 2बी श्रेणीतील मुस्लिमांसाठी असलेले चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले होते. नंतर सरकारने या चार टक्के आरक्षणाचे दोन भाग करून वोक्कलिगांच्या आरक्षणात 2सी अशी वाढ केली तर 2डी श्रेणीतील लिंगायतांना आणखी दोन टक्के आरक्षण दिले. सध्या याविषयीची एक केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.