पुणे – मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. रविवारी सायंकाळी चारही धरणांत मागील वर्षापेक्षा 3 टीएमसी जादा पाणी जमा झाले आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांचा पाणीसाठा तब्बल 28.79 टीएमसी (98.76 टक्के) झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 25.41 टीएमसी (87.17 टक्के) होता.
रविवारी ( 8 आॅगस्ट) सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात 20 मिमी, पानशेत धरणात 67 मिमी, वरसगाव धरणात 70 मिमी तर टेमघर धरणात 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पेक्षा पाणीसाठा जादा असल्याने पुढील वर्षभरासाठी पुणे शहर तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण हे 100 टक्के तर टेमघर धरण 90.22 टक्के भरले आहे. चारही धरणात मिळून एकूण 98.76 टक्के (28.79 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.