पुणे { प्रभात वृत्तसेवा } – खडकवासला प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत तीन टीएससी पेक्षा कमी पाणीसाठा आहे. सध्या, प्रकल्पात १७.२९ टीएमसी म्हणजे ६० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर, मागील वर्षी याच कालावधीत २०.२६ टीएमसी म्हणजेच ७० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी याच महिन्यांतकालवा समितीची बैठक लवकर घेण्यात येणार आहे.
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चारही धरणे कमी पावसामुळे जेमतेम भरली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली, त्यामुळे धरण साखळीत सुरुवातीपासूनच कमी पाणीसाठा होता. ऑक्टोंबर महिन्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित कालवा समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर मार्च महिन्यात कालवा समितीची बैठक घेण्यात येईल.
त्यावेळी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, बाष्पीभवन, पिण्यासाठी लागणारे पाणी याचा हिशोब करून एप्रिल, मे , जून आणि जुलै असे चार महिन्याचे पाणी वापराचे नियोजन करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले होते. तसेच पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायला पहिले प्राधान्य असेल. त्यानंतरच शिल्लक राहिलेले पाणी हे शेतीला देण्याचे काम करा, अशा सूचना ही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. परंतु, गेल्या काही महिन्यात धरणातील पाणीसाठा झपाट्याने कामी होत आहे. आजच्या दिवशी मागील वर्षीपेक्षा तीन टीएमसीने धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच कालवा समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.