नवी दिल्ली – करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडली असल्याने खेळाडूंना आता तयारीसाठी भरपुर वेळ मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी आपल्या कामगिरीतील सातत्य व फॉर्म स्पर्धेपर्यंत टिकवुन ठेवण्याचेच आता खेळाडूंसमोर आव्हान राहणार आहे, असे मत भारताचा नेमबाज अभिषेक वर्मा याने व्यक्त केले आहे.
करोनाच्या धोक्यामुळे जगातील अनेक क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिकसह पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता करोनाचा नायनाट झाला की विविध स्पर्धांची वेळापत्रके जाहीर होतील. तोपर्यंतचा वेळ खेळाडूंसाठी सरावासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मात्र, त्याचवेळी मलाच नव्हे तर सर्वच खेळाडूंना आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागणार आहेत, असेही त्याने सांगितले.
देशात लॉकडाउन असल्यामुळे खेळाडूंचा सराव तसेच त्यांचे प्रशिक्षण या सर्वांवरच बंदी आहे. ऑलिम्पिक पुढे गेल्याने खेळाडू घरातच बसून आहेत, काही खेळाडू घरीच व्यायाम करुन आपली तंदुरुस्ती टिकवुन ठेवण्यात व्यग्र आहेत. मी देखील घरीच माझ्या तंदुरुस्तीसाठी व्यायाम करतो. करोनाच्या धोक्याने ऑलिम्पिक पुढे गेले असले तरीही माझे लक्ष विचलित झालेले नाही, या स्पर्धेसाठी तसेच तयारीसाठी मिळालेला वेळ मी सत्कारणी लावत आहे, असेही त्याने स्पष्ट केले.