कोलकाता – टोकियो ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे गेल्यामुळे मिळालेला वेळ पथ्यावर पडला असून आता या काळात सराव तसेच तंदुरुस्तीवर भर देणार असल्याचे मत भारताचा अव्वल तिरंदाज तरुणदीप राय याने व्यक्त केले आहे. राय सध्या पुण्यात असून येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मधील सराव केंद्रात तंदुरुस्तीचे व्यायाम करत आहे. वैयक्तिक सराव जरी सुरु असला तरीही प्रत्यक्ष स्पर्धांमध्येच जास्त आव्हान असते, असेही त्याने सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सरस कामगिरी करण्याचे ध्येय बाळगलेला तरुणदीप कारकिर्दीतील तिसरे ऑलिम्पिक खेळणार आहे. ही स्पर्धा पुढे गेली त्यामुळे थोडी निराशा झाली, मात्र आता हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी अथक मेहनत घेणार आहे.
ऑलिम्पिकच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेत यश मिळविण्यासाठी खेळाबरोबरच तंदुरुस्ती देखील टिकवावी लागते. त्यासाठीच सरावाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. सगळे खेळाडू एकत्र येत सराव करणे सध्याच्या लॉकडाऊनमुळे शक्य नसल्याने वैयक्तिक सरावावर भर देत आहे. तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेले व्हिडीओ पाहुन तंदुरुस्तीचे व्यायामही करत आहे. आता लक्ष्य केवळ ऑलिम्पिकचे पदक हेच आहे, असेही त्याने स्पष्ट केले.