मुबई – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली. तेंव्हापासून राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. आज राऊत यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाकडून आजही त्यांना दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी तरी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. 21 ऑक्टोबरला राऊत यांना दिलासा न मिळाल्यास त्यांना कोठडीतच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून राऊत यांचा त्यात थेट सहभाग असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.