मुंबई – भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा शिवसैनिक त्यांना पळता भूई सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला आहे.
तसेच आतापर्यंत करोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील करोना नियंत्रणात राहिला आहे, असेही कायंदे यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत.
अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्यात आले आहे. मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल त्यांनी केला.
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजपा सहभागी होईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले होते.