कोल्हापूर – सीमेवर एखाद्या जवानाला वीरमरण येते, तेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात निषेध व्यक्त करतो. पाकिस्तानबाबत आपल्या मनात राग येतो. हुतात्मा जवानांप्रती प्रत्येकाच्या मनात आदर असतो. परिवाराला घरातला दिवा विझल्याचे दुःख तर असतेच, मात्र त्याहून अधिक त्यांच्या बलिदानाचा अभिमान सुद्धा असतो.
जवानांच्या अशा अनेक परिवारांशी गुजरातमधील जितेंद्र सिंह या सुरक्षा रक्षकाचे एक वेगळेच भावनिक नाते बनले आहे. त्यांनी नुकतेच कोल्हापूरमधील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या परिवाराला सुद्धा पत्र लिहले. गेल्या 21 वर्षांपासून देशातील प्रत्येक हुतात्मा जवानांच्या परिवाराला ते पत्र लिहित आहेत.
राजस्थानच्या एका छोट्याशा गावातून जितेंद्र सिंह गुजरातमध्ये कामानिमित्त आले आणि तिथेच ते स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते गुजरातमध्ये सुरक्षा रक्षकाची (सिक्युरिटीची) नोकरी करतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा राहतो.
गेल्या 21 वर्षांपासून ते देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक जवानाच्या परिवाराला पत्र लिहीत आले आहेत. नुकतेच त्यांनी कोल्हापुरातील दोन हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांना सुद्धा पत्र लिहले. प्रत्येकाला वीरमरण आलेल्या जवानांप्रती आदर असतो. जवानांच्या परिवाराला सुद्धा नेहमी आपण एका शूर पुत्राला जन्म दिला होता, अशीच भावना येत राहावी या उद्देशाने ते हा उपक्रम राबवतात.
कारगिल युद्धापासून जितेंद्र सिंह यांनी हुतात्मा जवानांच्या परिवाराला पत्र लिहायला सुरुवात केली. सर्वात पहिले पत्र त्यांनी खडकसिंह नावाच्या एका हुतात्मा जवानांच्या परिवाराला पाठवले होते. तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत पत्र लिहण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. आजही खडकसिंह यांच्या परिवारातील मुले जितेंद्र सिंह यांच्या संपर्कात असून नेहमी एकमेकांची खुशाली विचारत असतात.
जितेंद्र सिंह म्हणतात, कारगिल युद्धावेळी अनेक जवानांनी आपल्या कुटुंबीयांना पत्र लिहिली होती. मात्र, पत्र घरी पोहोचेपर्यंत अनेकजण हुतात्मा झाले होते आणि म्हणूनच मी अशा सर्वच कुटुंबीयांना पत्र लिहत आलो आहे.
5 हजारांहून अधिक पत्र
जितेंद्र सिंह यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला पहिले पत्र लिहले. त्यानंतर त्यांनी हजारो पत्र लिहली. आजपर्यंत त्यांनी 5 हजारांहून अधिक पत्रे लिहली आहेत. आज तब्बल 21 वर्षे सातत्याने अनेक जवानांच्या परिवाराला पत्र लिहत आहेत. यापुढे सुद्धा शक्य होईल तोपर्यंत मी पत्र लिहितच राहणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.