नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निलंबित अधिकारी बाबूलाल आगरवाल आणि त्यांच्या कुटूंबीयांची तब्बल 28 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ती कारवाई केली.
छत्तिसगढ सरकारचे प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या आगरवाल यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप आहेत. त्यावरून प्राप्तिकर विभागाने 2010 यावर्षी टाकलेल्या छाप्यांमुळे आगरवाल यांचे कारनामे समोर आले. त्यानंतर सीबीआयने संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला.
तपास पुढे नेताना सीबीआयने त्यांना काही वर्षांपूर्वी अटक केली. त्या कारवाईमुळे छत्तिसगढ सरकारने आगरवाल यांना निलंबित केले. आता ईडीकडून त्यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगची चौकशी केली जात आहे. ईडीने आगरवाल यांना चालू महिन्यात अटक केली.
त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात झाली आहे. ईडीने पुढील कारवाई करताना आगरवाल आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यामध्ये एक कारखाना आणि त्यातील यंत्रसामग्री, बॅंक खात्यांमधील 20 लाख रूपये, निवासी जागेचा समावेश आहे.