सांगली – केंद्र सरकारची भूमिका पक्षपातीपनाची असुन महाराष्ट्राबाबत सापत्नीक व दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी व मदतीसाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणी स्वाभीमानी पक्षाचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास 50 हजार कोटी इतके शेतीचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 75 व 25 टक्के तातडीने मदत केली पाहिजे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राज्यात शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यासाठी केंद्राने एनडीआरएफ पथके पाठवायला हवी, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच आज जागतिक तापमान वाढीचा फटका जगातील शेतीला बसत आहे, केवळ 2-3 देशाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला वैश्विक तापमान वाढीचा परिणाम सोसावा लागत आहे. त्यामुळे जगात फिरणाऱ्या आपल्या पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावर आवाज उठवला पाहिजे.
तसेच जागतिक आपत्ती निवारण कोष स्थापन करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त करत बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर आल्यावर त्याठिकाणी केंद्र सरकारने तातडीने मदत केली. मात्र, महाराष्ट्रात एवढं मोठे नुकसान झाले आहे, पण अद्याप मदतीची भूमिका घेतली नाही. त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका पक्षपातीपनाची असुन महाराष्ट्राबाबत सापत्नीक व दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.